नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी पंतप्रधान आणि पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी आपले धाकटे बंधू आणि माजी पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांना या आघाडी सरकारच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार केले आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पीपीपी पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे या आघाडी सरकारला संसदेमध्ये साधे बहुमत मिळणार आहे. त्यामुळे शेहबाझ शरीफ हे पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान बनणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ गटाची मंगळवारी संध्याकाळी बैठक झाली. त्यामध्ये नवाझ शरीफ यांच्या ऐवजी शेहबाझ शरीफ यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले गेल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
तत्पूर्वी शेहबाझ शरीफ यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी आणि मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तानचे नेते खालिद मकबूल सिद्दीकी यांची पाकिस्तान मुस्लिम लीग- क्वेड गटाचे नेते शुजात हुसेन यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
आम्ही सर्वांनी विभाजीत जनादेश स्वीकारला आहे. आघाडी सरकारमध्ये सामील होण्यास मान्यता दिली याबद्दल झरदारी आणि बिलावल भुट्टो यांचे आभार मानतो, असे शेहबाझ शरीफ यांनी यावेळी सांगितले होते.
पंतप्रधान पदासाठी नवाझ शरीफ यांनीच शेहबाझ शरीफ यांचे नाव सुचवल्याचे पीएमएल-एनच्या सचिव मरीयम औरंगझेब यांनी सांगितले. सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या या सर्व पक्षांना शेहबाझ शरीफ यांनी धन्यवाद दिले आहेत. तसेच पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा मरियम नवाझ यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शेहबाझ शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान
इम्रान खान यांना एप्रिल २०२२ मध्ये सत्तेवरून हटवल्यानंतर शेहबाझ शरीफ पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. निवडणूक झाल्यानंतर पीएमएल-एन पक्षाला अन्य पक्षांबरोबर मिळून दोन तृतीयांश बहुमत प्राप्त झाले आहे. पीएमएल-एन, पीपीपी, एमक्यूएम-पी, पीएमएल-क्यू, आयपीपी(इत्तेहकाम-ए-पाकिस्तान पार्टी) आणि बलुचिस्तान आवामी पार्टी (बीएपी) या पक्षांचे मिळून आघाडीकडे एकूण १५२ सदस्यांचे संख्याबळ आहे. सरकार स्थापन करण्यासाठी किमान १६९ सदस्यांचे संख्याबळ हवे आहे. राखीव ६० महिला आणि १० अल्पसंख्य मिळून आघाडी हे उद्दिष्ट सहज गाठू शकते. मात्र ३३६ सदस्यांच्या संसदेत दोन तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक २२४ चे संख्याबळ ही आघाडी मिळवू शकते का, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.