बिजवडी, {मधुकर गलांडे} –बारामती लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत आम्हाला दिलेला शब्द पाळला जात नाही; मात्र प्रत्येक वेळी दिलेला शब्द आम्ही पाळायचा, लोकसभेची निवडणूक झाली की विधानसभेच्या वेळी आमच्या विरोधात उमेदवार उभा करायचा, अशी खंत भाजपचे नेते आणि राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
बोरी गावामध्ये भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत पाटील यांनी भेट दिली असता त्यांनी प्रभातशी संवाद साधला. ते आम्ही बारामती लोकसभेच्या निवडणुकीत 2004 ते 2014 आणि 2019ला सुद्धा आम्ही आघाडीचा धर्म पाळला. या सर्व निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभेला आघाडीने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार अत्यंत प्रामाणिकपणे केला. काही गावांमध्ये पक्षीय त्रास होत असताना सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले.
लोकसभेच्या निवडणुका झाल्या की, आम्ही ज्यांच्यासाठी काम केलं; मात्र विधानसभेच्या वेळेस त्यांनी भूमिका बदलायची. असा प्रकार हा एक वेळेस नाही तर सलग बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आमच्याबरोबर तीन वेळेस झालेला आहे. 2009मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आमच्या विरोधात ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना पक्षातून तात्पुरतं काढण्यात आलं; मात्र त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाने तिकीट दिलं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा केलं. हे सर्व इंदापूर तालुक्यातील जनता विसरलेली नाही. म्हणून मला वाटतं या येणार्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही सर्व चर्चा वरिष्ठ पातळीवर योग्य ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही.
2024च्या उद्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाला मिळाली तर, काही हरकत नाही. तो आमच्याच महायुतीतील एक घटक पक्ष आहे. महायुती म्हणून आम्ही त्याचा विचार करूच; मात्र इंदापूर तालुक्याचे आताचे लोकप्रतिनिधी आहेत ते सतत सांगताहेत मी इतका निधी आणला मी हे काम केलं मी ते काम केलं.
वास्तविक हा सर्व निधी महायुती सरकारचा आहे. कुठल्या एका वैयक्तिक पक्षाचा नाही. या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे 120 आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 40 आणि उरलेले35-40 आमदार असतील ते ह्या पक्षाचे. सर्वांचे मिळून महाराष्ट्रातील हे महायुती सरकार आहे.
प्रशासकीय वचक राहिला नाही
हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील होत असलेल्या कामांच्या निकृष्ट दर्जाबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं. लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय वचक नसल्याने आज तालुक्यामध्ये आरोग्याची परिस्थिती काय आहे. शिक्षणाची परिस्थिती काय आहे. हे तालुक्यातील संपूर्ण जनतेला माहित आहे मागील नऊ वर्षांमध्ये या तालुक्यात एकही नवीन शाळा नाही, अथवा शैक्षणिक धोरण नाही.
बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न नाहीत, शेतकर्यांच्या बाबतीत कोणतीही त्याचा दिसत नाही, उजनीच्या पाण्यावर शब्द नाही. हे सर्व या तालुक्यातील जनता विसरलेली नाही असाही टोला त्यांनी विद्यमान प्रतिनिधी दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केला.
मी खोट्या शपथा घेत नाही.
मी दिखाऊपणाचे काम करत नाही. माझ्याकडे खोटा प्रकार नसतो. कोणत्या गावात गेल्यावर तेथील कुलदैवताची खोटी शपथ घेत नाही. माझी नाळ तळागाळातल्या लोकांशी जोडली गेलीय. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी जिंकता जिंकता हरलोय. या तालुक्यातील जनतेचे माझ्यावर प्रेम आहे आणि माझा जनतेवर विश्वास आणि प्रेम आहे.
तालुक्यातील राजकारणावरच काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. लोकसभा लागली की माझे नाव येते. राज्यसभा लागली की आले. विधान परिषद आली तरी माझे नाव येते. यातून एक निश्चित आहे. कुठेना कुठेतरी हर्षवर्धन पाटलांची नोंद होते. शेवटी जिथे शक्तीकेंद आहे तिथेच नावाची चर्चा होते. बाकीच्या बाबतीत तालुक्याचे नाव निघण्यापेक्षा असे निघाले तर काय वाईट आहे.