manoj jarange patil : आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करायचे नाही. तीन वेळा भुजबळ यांनी विरोध केला आता चौथ्यांदा त्यांनी विरोध केल्यास मंडल आयोगाला चॅलेंज करणार. तर भुजबळ हे राजीनामा देणारे नसून दुसऱ्यांचा राजीनामा घेणारे आहेत. त्यांच्या इतक्या खालच्या दर्जाचा मी नाही, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. नाशिकमध्ये जरांगे पाटील बोलत होते.
जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव येथे ते भेट देणार आहेत. त्यापूर्वीच ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक दौऱ्यात जरांगे यांचे मराठा समाजाकडून ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होत आहे. याशिवाय ते साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शनही घेणार आहेत.
माफी न मागणे ही मग्रुरी
यावेळी जरांगे यांनी भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, “छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर ते मग्रुर आहेत असा अर्थ निघतो”, असे मनोज जरांगे म्हणाले.
कोणाचे ऐकणार नाही
जरांगे यांनी विरोधकांसह, राज्यकर्त्यांना इशारा दिला आहे. आता १० तारखेनंतर कोणाचेच ऐकणार नाही. अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार असून हे आमरण उपोषण कठोर असणार असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भुजबळ ज्या पक्षात जातात, तो पक्ष मोडीत काढतात अशी टीकाही त्यांनी केली.