खासदार डॉ. अमोल कोल्हे : भौतिक सुविधांनी नाही, तर मनातील देशभक्तीने राष्ट्र बनते
नारायणगाव : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे पाकिस्तानातून इतर देशांना कांदा निर्यात होत असल्याने तेथील शेतकऱ्यांचे भले झाले आहे. केंद्र सरकार ज्या पाकिस्तानचे कंबर मोडणार अशी भाषा करीत होते, त्याच सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आठ ते दहा रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे पाकिस्तानऐवजी आपल्याच देशातील शेतकऱ्यांचे कंबर मोडले आहे, अशी घणाघाती टीका शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केली.
खासदार कोल्हे म्हणाले की, देशाचा विकास म्हणजे मोठमोठ्या इमारती, अर्थसंकल्पातील आकडे, नवनवीन भौतिक सुविधांनी होत नाही, तर देशातील राहणारी व्यक्ती व त्याच्या मनातील देशभक्तीने राष्ट्र बनते. देशातील प्रत्येक जण भयमुक्त वातावरणात राहणे पसंद करतो. परंतु, माझ्या मतदारसंघात तशी परिस्थिती नाही. राष्ट्रीय वन्य प्राणी सर्वेक्षणात माझ्या मतदारसंघात ४०० ते ५०० वाघांचा अधिवास आहे. शेतकऱ्यांना थ्री फेज वीज नसल्याने रात्रीच्या वेळी शेतीला पाणी भरण्यासाठी जावे लागत असल्याने दर दिवशी शेतकऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले होत आहे.
मागील वर्षी वीस ते पंचवीस शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यासाठी शेतीला दिवसा थ्री फेज वीज मिळावी व केंद्र सरकारने लक्ष घालून बिबट्यांची नसबंदी करून प्रजनन होणार नाही, यासाठी राज्य सरकार व वन विभागाला आदेश द्यावेत.अनधिकृत घरांना दिलासा देण्यासाठी इंग्रजांच्या काळातील १९०३ च्या कायद्यात बदल करून १९७० च्या कायद्याची अंमलबजावणी करावी व दोनशे ते पाचशे मीटर रेड झोन निश्चित करुन देशवासीयांना संरक्षण द्यावे, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केवळ फोलपणा
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेतील फोलपणा उघड करताना खासदार डॉ. कोल्हे यांनी सन २०१३ मध्ये डीएपीची बॅगची किंमत ५६० रुपये होती, तर २०२४ मध्ये या बॅगची किंमत ११०० रुपये झाली. मजुरीचा दर ५ हजार होता तो आता ११ हजार झाला, असे असताना २०१३ मध्ये कांद्याचा दर २० रुपये किलो आणि आज २०२४ मध्ये कांद्याचा दर ८-१० रुपये किलो आहे. मग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले की, दुपटीने कमी झाले असा वस्तुनिष्ठ सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी केला.