अकोले – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी तयार केलेली राज्यघटना ही आदर्श असून, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतात सर्व लोक गुण्या गोविंदाने राहात आहेत. या राज्यघटनेने आपल्याला हक्क व कर्तव्य दिली असून सर्वांनी राष्ट्राप्रति आपली भावना जागृत ठेवून राज्यघटनेचा आदर करावा, असे प्रतिपादन माजी आ.वैभव पिचड यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त एमकेसीएल व संदेश कॉम्पुटर्स यांच्यामार्फत अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले, पोलिटेक्निक कॉलेज, अकोले, कन्या विद्या मंदीर अकोले, अगस्ती विद्यालय, अकोले, आयटीआय अकोले, अभिनव शिक्षण संस्था या ठिकाणी संविधानाचे प्रास्ताविक फलक दर्शनी भागात लावण्यासाठी संविधान “उद्देशिका ” फलक भेट देण्यात आले.
यावेळी पोलिटेक्निक कॉलेज येथे संस्थेचे कायम विश्वस्त तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी प्राचार्य डॉ. आर. डी. पल्हाडे,संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, कार्यकारिणी सदस्य यशवंतराव आभाळे, भाजप तालुका सरचिटणीस राहूल देशमुख व विद्यार्थी यांनी संविधान उद्देशिका फलक स्वीकारले. यावेळी मा.आ.पिचड बोलत होते.
राज्यातील शाळा/महाविद्यालयांमध्ये संविधान जागृतीसाठी MKCL पुणे व संदेश कॉम्प्युटर्स अकोले यांचेमार्फत संविधान ” उद्देशिका “फलक शाळा/महाविद्यालयाचे दर्शनी भागात कायमस्वरूपी लावण्यासाठी देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी संदेश काॅम्पुटर्सचे संचालक हेमंत मोरे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्राचार्य डॉ. आर. डी. पल्हाडे यांनी मानले.