Nitish Kumar : लोकसभा निवडणुकीचा शंखनाद होण्यापूर्वी विरोधी गटातील दिग्गज नेत्यांना रालोआत आणण्याच्या योजनेवर भाजप काम करीत आहे. भाजप नेते अन्य पक्षांतील नेत्यांशी नियमित संपर्कात असून या कामात कमालिची गुप्तता पाळली जात आहे, हे येथे उल्लेखनीय.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेत्यांचा खरा डोळा आहे तो बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी त्यांना रालोआत आणण्याची भाजपची योजना आहे. याशिवाय, बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत शंभर लोकांना पक्षात आणण्याच्या योजनेवर काम सुरू आहे.
महत्वाचे म्हणजे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीचे पद नाकारल्यामुळे भाजपच्या आशांना पंख फुटले आहेत. नितीशकुमार केवळ कॉग्रेसवर नाराज आहेत असे नव्हे तर लालप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलावर सुध्दा नाराज आहेत. यामुळे नितीशकुमार रालोआत येवू शकतात, असे भाजपला वाटते.
मुळात, नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करावे, अशी लालप्रसाद यादव यांची इच्छा आहे. नितीशकुमार यांनी आता बिहार सोडून राष्ट्रीय राजकारण भूमिका निभवावी असे राजदचे म्हणणे आहे. नितीशकुमार यांना मात्र मुख्यमंत्रीपदावर राहून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय रहायचे आहे. लालूप्रसाद यादव यांचा या गोष्टीला विरोध आहे.
जेडीयू आणि राजद यांच्यात निर्माण झालेली दरी आणि इंडीया आघाडीचे नितीशकुमार यांनी सोडलेले संयोजक पद भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या रणनितीकारांनी हीच बाब हेरली असून भाजपचे दिग्गज नेते नितीशकुमार यांच्याशी गुप्तपणे संपर्क साधत असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वात विरोधी गटातील दिग्गज नेत्यांना भाजपात आणण्याची रणनिती तयार केली जात आहे. जवळपास पन्नास नेत्यांची भाजपात प्रवेशाची योजना तयार झाली आहे. हे नेते कोणत्याही क्षणी कमळ हातात घेवू शकतात.