लखीमपूर (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा गुवाहाटी येथे पक्षाच्या भारत जोडो न्याय यात्रा कार्यक्रमाला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत असा आरोप कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. लखीमपुरमधे ज्या मार्गावरून आज ही यात्रा जाणार होती, त्या यात्रा मार्गावर लावण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या सर्व फलकांची मोडतोड करण्यात आली आहे. भाजपच्या स्थानिक गुंडांनीच हा उपद्रव माजवला असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. हा या यात्रेवरचाच हल्ला आहे असे कॉंग्रेसने दिल्लीहून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जयराम रमेश म्हणाले की, आमच्या वेळापत्रकानुसार २३ जानेवारी रोजी आम्ही गुवाहाटी येथे मुक्काम करणार आहोत. आमची यात्रा नियोजना प्रमाणे पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. गुवाहाटीमध्ये आमच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये यासाठी आसामचे मुख्यमंत्री सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अनेक अडथळे आमच्यासमोर उभे केले जात आहेत असे जयराम रमेश यांनी आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
आसामातील यात्रा कार्यक्रमाची सविस्तर माहितीही त्यांनी दिली. २३ जानेवारीला दुपारी ३ वाजता इटानगरला पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे आणि जाहीर सभा होणार आहे. २२ जानेवारीला आसामच्या कालियाबोर येथे दुपारी एक जाहीर सभा आयोजित केली आहे ज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी जनतेला संबोधित करतील.
आम्ही 25 जानेवारीपर्यंत आसाममध्ये असून25 जानेवारीला दुपारी आम्ही उत्तर बंगालमध्ये पोहोचू आणि रात्रीचा मुक्काम करू. २६ आणि २७ जानेवारीला यात्रेला सुट्टी असेल. २६ आणि २७ जानेवारीला राहुल गांधी दिल्लीत असतील,२८ जानेवारी रोजी, आम्ही उत्तर बंगालमध्ये आमची भारत जोडो न्याय यात्रा सुरू ठेवू ज्यात राहुल गांधी देखील सहभागी होणार आहेत,असे त्यांनी सांगितले.
यात्रेच्या वैचारिक चौकटीबद्दल बोलताना जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रा ही आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेवर आधारित आहे. आम्हाला लोकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय द्यायचा आहे. राहुल गांधी यांच्यासाठी न्याय म्हणजे महिलांसाठी, तरुणांसाठी, शेतकरी, मजुरांना न्याय आणि संसाधानाचे समान वाटप असे आहे.