कराड – भाजप ही रणजीची टीम नसून, आयपीएलची टीम आहे. या टीमचे कॅप्टन खासदार उदयनराजे भोसले हेच आहेत. कोणाला टीममध्ये घ्यायचे आणि कोणाला टीममधून बाहेर ठेवायचे, हे तेच ठरवतील; परंतु त्यांनी आम्हाला त्यांच्या टीममध्ये घ्यावे, अशी मिश्कील टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर कृष्णा परिवारातर्फे आयोजित कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अतुल भोसले यांनी प्रास्ताविक करताना, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा नवा आराखडा तयार करून, त्यासाठी भरघोस निधी देण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर, कराडला होणार्या नव्या स्टेडियमवरील पहिल्या रणजी सामन्याचे कॅप्टन देवेंद्र फडणवीस हेच असतील. अतुलबाबाही त्या टीमचे सदस्य असतील. आम्हालाही त्या टीममध्ये घ्यावे. राखीव खेळाडू म्हणून बाजूला ठेवू नये, अशी टिप्पणी उदयनराजे यांनी केली. त्यावर बोलताना फडणवीस यांनीही मिश्कील राजकीय टिप्पणी केली.
देशातील सर्वांत उंच बैल आणि एक टनाचा रेडा हे या महोत्सवाचे आकर्षण आहे. कृष्णा परिवाराने शेतकर्यांसाठी राबवलेली कृषी महोत्सवासारखी योजना महत्त्वपूर्ण आहे; परंतु सध्या मुंबईत काही रेडे माजले आहेत. ते वाट्टेल ते बरळत आहेत. त्यांना गप्प करण्यासाठी एखादी योजना असेल, तर सांगा, अशी बोचरी टीकाही फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता केली.
उदयनराजे म्हणाले, अमुकतमुक हा आमचा बालेकिल्ला आहे; असे म्हणणार्यांना कशाचा अहंकार आहे, माहिती नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बैलगाडी चालवताना बैलांचा कासरा हातात घेतला. आगामी काळात त्यांना राज्याच्या गाडीचा कासरा हातात घ्यावा लागणार आहे. राज्यातील 48 खासदार महायुतीचेच निवडून येतील. डॉ. अतुल भोसले म्हणाले, अटल सेतूचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते, तर उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा प्रभू श्रीराम यांनी दिलेला एकप्रकारे आशीर्वादच म्हणावा लागेल.