बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांचा आज वाढदिवस. त्यांनी यानिमित्ताने पक्षाच्या लखनौमधील मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांनी या निवडणुकीत एकाकीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून कोणाशी आघाडी करण्याच्या विषयावर आम्ही निवडणुकीनंतर निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.
वास्तविक खूप आधीच त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता; परंतु मध्यंतरी उत्तरप्रदेशात झालेल्या एका पोट निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे त्याचा समाजवादी पक्षाला लाभ झाला होता. त्यामुळे त्या विरोधी इंडिया आघाडीत सामील होऊ शकतील अशा अटकळी बांधल्या जात होत्या. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विशेषत: काँग्रेसने त्यांच्या विरोधात काहीही भाष्य न करण्याची भूमिका घेतली आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेशही त्यांच्या विरोधात काही आक्रमक बोलत नाहीत. परंतु तरीही त्यांनी याही निवडणुकीत एकट्यानेच सामोरे जाण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो त्यांच्या पक्षाला फारसा लाभदायी नाही, हे वास्तव आहे. त्याची मायावती यांनाही कल्पना नाही असेही मानता येणार नाही; परंतु तरीही त्यांनी स्वबळावर लढण्याचा आपला हेका सोडलेला नाही. त्यांनी स्वतंत्र लढण्याने उत्तरप्रदेशात भाजपलाच लाभ होणार आहे याची त्यांनाही कल्पना आहे, पण तरीही त्यांनी ही भूमिका का घेतली असावी हे मात्र अनाकलनीय आहे. वास्तविक मायावती यांच्या पक्षाचा उत्तरप्रदेशातील बेस आता कमी कमी होऊ लागला आहे. अलीकडच्या काळात तर त्यांच्या मतांची टक्केवारी जेमतेम दहा-साडेदहा टक्क्यांवर आली आहे.
एकेकाळी उत्तरप्रदेशात स्वबळावर सत्ता मिळवणारा हा एक प्रबळ राष्ट्रीय पक्ष होता. परंतु नंतरच्या काळात या पक्षाला सातत्याने उतरती कळा लागली आहे. वास्तविक राजकारणातील मायावतींचा अनुभव दांडगा आहे आणि उत्तरप्रदेशातील राजकारणात या पक्षाला स्वतःचे वेगळे स्थान आहे. परंतु सततच्या एकटेपणाने त्यांचा प्रभाव आता मावळत चालला आहे. दलित आणि उपेक्षित समाजाचा राजकीय आवाज म्हणून त्यांच्या पक्षाची ओळख होती तीही आता मावळत चालली आहे. वास्तविक प्रचलित राजकारणात भाजपला त्यांनी प्रथम क्रमांकाचा शत्रू मानणे अपेक्षित होते आणि त्यानुसार आपल्या पक्षाची रणनीती निश्चित करणे अपेक्षित होते. पण त्या मात्र अजून त्यासाठी राजी नाहीत. त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीसाठी सन 2024 ची लोकसभेची निवडणूक ही शेवटची संधी आहे. आपल्या एकलकोंडे स्वभावाने ती संधीही त्या गमावून बसल्या आहेत असे म्हणावे लागेल.
मायावती केवळ भाजपलाच अनुकूल असल्याचे लोेकांनाही जाणवू लागले आहे. तथापि त्यांची भाषा मात्र नेहमी भाजप आणि काँग्रेसला समान अंतरावर ठेवण्याची राहिली आहे. असे असले तरी आपल्या एकट्याच्या बळावर आपल्याला पुरेसे राजकीय यश लाभत नाही याचा त्यांना एव्हाना अंदाज यायला हवा होता. या संबंधात आज त्यांनी जो युक्तिवाद केला आहे, त्यानुसार त्यांचे म्हणणे असे आहे की अन्य राजकीय पक्षांबरोबर केल्या जाणार्या आघाडीचा आमचा आधीचा अनुभव आम्हाला लाभदायी नाही. आम्ही ज्यांच्याशी आघाडी करतो त्या पक्षालाच आमचा लाभ होतो पण त्यांचा लाभ आम्हाला होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. वरकरणी त्यांचा हा युक्तिवाद संयुक्तिक ठरत असला तरी तो सध्याच्या प्रचलित राजकारणानुरूप नाही. उत्तरप्रदेश बाहेरही त्यांच्या पक्षाला काही प्रमाणात व्होट बँक आहे. पण त्याही ठिकाणी त्या स्वबळावरच सगळ्या निवडणुका लढतात. त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक ठिकाणी काही हजार मते पडतात आणि अंतिमत: त्या ठिकाणी भाजपलाच लाभ होतो; कारण बहुजन समाजाला पडणारी मतेही बहुतांशी दलित आणि मागास किंवा अन्य उपेक्षित गटातील मतदारांची असतात. आणि या मतांमध्ये होणार्या फुटीचा अंतिम लाभ भाजपलाच होतो. आगामी लोकसभा निवडणुकीतही उत्तरप्रदेशसह अन्यत्र हेच चित्र दिसणार असेल आणि त्यांना पडणारी मते अशीच वाया जाणार असतील आणि भाजपलाच त्याचा लाभ होणार असेल तर आपल्या या भूमिकेचा त्यांनी निदान यावेळी तरी विचार करणे अपेक्षित होेते.
भाजपने त्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात बहुजन समाज पक्षावर आणि मायावती यांच्यावर कृपादृष्टीच केलेली दिसली आहे. देशभरातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अनेक वेळा कारवाया झाल्या, ईडी आणि आयकर विभागाचे छापे पडले पण मायावती यांच्यावर मात्र एकही कारवाई झालेली नाही, हे कशाचे लक्षण मानायचे असा सवाल त्यांचे विरोधक करीत असतात. ताज कॉरिडॉर प्रकरणातील त्यांच्या गैरव्यवहारावर उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने काहीही कारवाई केलेली दिसली नाही. त्यामुळेच भाजपच्या या उपकाराला अनुकूल अशीच भूमिका मायावती घेत असाव्यात का, असा प्रश्न त्यांच्या बाबतीत निर्माण होतो आहे. कायम स्वबळावर लढण्याने स्वतःची कमावलेली व्होट बँक कायम राहील अशी त्यांची धारणा असली तरी ती खरी नाही. त्यांची व्होट बँक आता नाहीशी होताना दिसत आहे.
मायावतींची एकूण राजकीय सक्रियताही अलीकडच्या काळात मंदावलेली दिसली. तशातच त्यांनी आपला राजकीय उत्तराधिकारीही जाहीर केला आहे. त्यामुळे त्या आता राजकीय निवृत्तीच्या मूड मध्ये गेल्या आहेत, असेही सांगितले जाऊ लागले आहेत. त्याचेही मायावती यांनी आज निराकरण केले आणि आपण इतक्यात राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात नाही, असे स्पष्ट केले. मायावती यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे, त्या आधारावर त्यांना देशात तिसर्या आघाडीचे नेतृत्वही करण्याची संधी होती. बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप अशी छोट्या किंवा अन्य प्रादेशिक पक्षांची आघाडी करून त्याचे नेतृत्व करीत व्यापक स्वरूपाचे राजकारण करणे त्यांना शक्य होते. पण त्या प्रयत्नांतही त्या दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे हे एकटे राहण्याचे धोरण राजकीय तज्ज्ञांना बुचकळ्यात पाडणारे दिसत आहे.