सोलापूर – यंदा उजनी धरणातील पाणीसाठ्याची अवस्था अतिशय बिकट बनली असून, पावसाने फिरवलेली पाठ आणि ढिसाळ नियोजन यामुळे आताच उजनी धरणाची पाणीपातळी अवघ्या 9 टक्क्यांवर पोहचली आहे. अशात आज घडीला कालव्यातून दुसरी पाळी देण्याचे ठरल्यास 22 जानेवारीपर्यंत उजनीची पाणीपातळी वजा होईल.
सध्या उजनी धरणातून सोलापूर महापालिकेसह, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा नगरपालिकेला पिण्यासाठी 5 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर शहरातील नागरिकांना पाण्याची बचत करण्याची वेळ येणार आहे.
आज उजनी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठी शिल्लक असून, गेल्यावर्षी याच दिवशी तब्बल 101 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा होता. सोलापूरची तहान भागवण्यासाठी धरणातून 5 टीएमसी पाणी सोडावे लागते. हे पाणी सोलापूरकरांना केवळ 50 दिवस पुरणार असल्याने अजून मार्च आणि मे महिन्यात दोन रोटेशनमधून 10 ते 12 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.
यातच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा अलनिनो किंवा सुपर अलनिनोचा फटका बसल्यास जुलैमध्येही पाण्याचे रोटेशन सोडावे लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात मृत साठ्यातून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.
लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात 38 टक्के घट
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील 750 लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 38 टक्क्यांनी कमी झाला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली. या प्रकल्पांमधील जलसाठा 12 जानेवारीपर्यंत 24 टक्के होता, तर गेल्या वर्षी याच वेळी 62 टक्के होता. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे 19 टक्के पाण्याची कमतरता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या 750 प्रकल्पांची एकूण क्षमता 1633.08 एमसीएम असली तरी सध्याचा साठा केवळ 392.37 एमसीएम आहे.