Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र विरोधकांनी हा भाजपने निवडणुकी डोळयासमोर ठेवून केलेला हा सोहळा करणार असल्याचा आरोप केला. याशिवाय या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास चार शंकराचार्यांनी विरोध केला असून तेही या सोहळ्यास येणार नाहीत.
यामागचे कारण पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, “अयोध्येत रामलल्लाच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम होतो आहे, तो धर्मांतील प्रस्थापित परंपरांना अनुसरून नाही, त्यामुळेच चारही शंकराचार्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.”
“शंकराचार्य स्वतःची प्रतिष्ठा राखतात. हा आमचा अहंकार नाही. पंतप्रधान जेव्हा रामलल्लाची मूर्तीचप प्रतिष्ठापना करणार त्यावेळी आम्ही काय फक्त बाहेर बसून टाळ्या वाजवणे अपेक्षित आहे काय?” असा सवालही त्यांनी केला. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भाजपने जोरदार वातावरण निर्मीती केली असली तरी त्यावर शंकराचार्यांच्या बहिष्काराचे सावट पसरले आहे. चारही शंकराचार्यांचीच प्रतिष्ठापना सोहोळ्यास अनुमती नसेल तर हा केवळ एक राजकीय कार्यक्रम बनला आहे अशी टीका कॉंग्रेस सह सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.
कॉंग्रेस नेते अशोक गहलोत यांनी म्हटले आहे की, चारही शंकराचार्य तिथे येणार नसतील तर त्यासाठी त्यांनी जे कारण दिले आहे त्याला महत्व दिले पाहिजे. अपुर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही, आणि तिथे मुहुर्त नसताना केवळ राजकीय स्वार्थासाठी प्रतिष्ठापना केली जाऊ शकत नाही असा शंकराचार्यांचा आक्षेप आहे. ज्या मंदिराला कळस नाही तिथे प्रतिष्ठापना होऊ शकत नाही असेही या शंकराचार्यांचे म्हणणे आहे.