लोणावळा (विशाल पाडाळे) – महाराष्ट्राच्या अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची सध्याची झालेली विटलेली अवस्था बघून अक्षरशः ही देवनदी “अरे कोणीतरी काही करा रे.. श्वास, कोंडतोय माझा” अशी साद घालत असल्याचा पदोपदी भास होत राहतो आहे.
लोणावळा शहरात उगम पावणारी इंद्रायणी नदी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत पवित्र मानली गेली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांची कारकीर्द ज्या आळंदी या आणि देहू गावात घडली. ती दोन्ही गावं इंद्रायणी नदीच्या तीरावर बसलेली आहेत. शिवाय इंद्रायणी नदी ज्या भीमा नदीमध्ये जाऊन विलीन होते त्या भीमेच्या काठावरच पुढे श्रीक्षेत्र पंढरपूर वसलेले आहे. अशा या पवित्र नदीची लोणावळा शहरातील दुरावस्था बघितल्यास याच नदीला देवनदी म्हणून संबोधले जाते का? असा प्रश्न पडतो. शहरातून वाहणाऱ्या या नदीची सद्याची परिस्थिती पाहिली असता पुढील काळात कोणत्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागणार याची कल्पनाच करवत नाही.
स्वच्छतेच्या बाबत संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाच्या शर्यतीत असलेल्या लोणावळा शहराला इंद्रायणी नदीची दुरावस्था एक डोकेदुखी बनून राहिलेली आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरातून वाहणाऱ्या साबरमती नदीचा कायापालट कशाप्रकारे केला गेला याची माहिती घेण्यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि तत्कालीन उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांपूर्वी दौरा काढण्यात आला होता. मात्र कोरोना संकटाने सर्व काही जाग्यावरच थांबले गेले.
इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा नगरपरिषद हद्दीजवळील कुरवंडे येथील डोंगरामध्ये आहे. साधारणपणे उगम ते वलवण हद्द अशी 4 कि.मि. लांबी आहे. पावसाळयात ही नदी वाहती असते. लोणावळा शहरात इंद्रायणी नदी तीराचे आजूबाजूस रहिवासी वस्ती आहे. नदीमध्ये ठिकठिकाणी नाले जोडलेले आहेत. नाल्यांमधून येणारे सांडपाणी नदी पात्रात मिसळले जाते.
काही ठिकाणी नदी पात्राच्या बाजुने रस्ता, वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने नदीतून गाळ काढणे शक्य होत नाही. याशिवाय नदीच्या पाण्यावर डासांचा प्रादूर्भाव होणं, जलपर्णी तयार होणं या बाबी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पावसाळा वगळता नदीचे शहरातील पात्र जास्तीत जास्त काळ जलपर्णी खाली झाकलं गेलेलं असत. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नदीला उतार नसल्याने नदी पात्राच्या आजूबाजूस असलेल्या नागरी वस्तीत पाणी जाऊन पुर परिस्थती निर्माण होते.
आवश्यक उपाययोजना
नदीपात्राचे रुंदीकरण करणे – नदीपात्राची मोजणी करणे आवश्यक. नदी पात्राची रुंदी निश्चित होवून आवश्यक ती खोदाई करुन नदी पात्र रुंद करणे शक्य होईल.
नदीपात्रातील गाळ काढणे – नदीपात्राची लांबी 4 कि.मिटर व सरासरी रुंदी 15 मिटर आहे. पुरपरिस्थती नियंत्रणासाठी गाळ काढणे आवश्यक.
संरक्षक भिंत बांधणे – पुरनियंत्रणासाठी नदीपात्राचे दुतर्फा संरक्षक भिंत बंधन आवश्यक.
नाले एकत्रिकरण करणे – शहरातील काही मोठे नाले नदीपात्रात सोडले जातात त्यामध्ये मुख्य 5 नाले असून त्यांना जोडणे आवश्यक.
जैविक प्रक्रिया करणे – नाल्यातील सांडपाण्यावर 7 ते 8 ठिकाणी जैविक प्रक्रिया संरचना उभारणे
नदी सुशोभिकरण करणे – नदी पात्राचे दुतर्फा वृक्ष लागवड व सुशोभिकरण करणे आवश्यक