आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच सर्वच प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याच वेळी निवडणुकीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकणार्या काही छोट्या राजकीय पक्षांनीसुद्धा आपल्या अपेक्षा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित विकास आघाडीला जरी ‘इंडिया’ आघाडीत स्थान देण्यात आल्याचा निर्णय उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर केला असला, तरी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये इतरही छोटे पक्ष अद्यापही तळ्यात की मळ्यात या विचारात आहेत.
देशात आणि महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या मित्र पक्षांपैकी रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष असो किंवा महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पार्टी हा पक्ष असो किंवा सदाभाऊ खोत यांची रयत संघटना असो या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या अपेक्षा गेल्या काही दिवसांमध्ये व्यक्त केल्या आहेत. या व्यतिरिक्त राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा कोणती भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देणारे प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचीसुद्धा भूमिका येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाची ठरणार आहे.
सर्व छोट्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आगामी कालावधीमध्ये आपली भूमिका काय असेल याबाबत संकेत दिले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पाठिंबा देणारे बच्चू कडू यांनी गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती आणि तेव्हा वेगळ्या चर्चेला तोंड फुटले होते. तेव्हाच आमच्या पक्षाच्या वाढीला जो पक्ष प्रोत्साहन देईल त्या पक्षाच्या पाठीशी आम्ही उभे राहू, अशी स्पष्ट भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली होती. एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्रिपदावर आहेत तोपर्यंत या सरकारला आमचा पाठिंबा कायम असेल, असे त्यांनी म्हटले आहे. पण लोकसभा निवडणुकीमध्ये एखादी तरी जागा मिळण्याची त्यांची अपेक्षा त्यांनी लपवून ठेवलेली नाही. अनेक वर्षे केंद्रातील आणि राज्यातील भाजपसोबत असलेले रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीनेसुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून आम्हाला किमान दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपबरोबर मैत्री राखणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनीसुद्धा लोकसभा निवडणुकीत आपला योग्य सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तशाच प्रकारची अपेक्षा सदाभाऊ खोत यांनीही व्यक्त केली आहे. हे सर्वजण भाजपचे मित्र पक्ष असल्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जागावाटप करत असताना भाजपसमोर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यापासून समान अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने जाहीर केल्याप्रमाणे हातकणंगले मतदारसंघांमध्ये राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. त्यांच्या या निर्णयाला विरोध करणारी भूमिका घेतल्याने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची याच कारणावरून हकालपट्टी करण्यात आली आहे हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे.
शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणार्या खासदारांना पराभूत करण्याच्या दृष्टिकोनातूनच जरी उद्धव ठाकरे यांचा गट अशी रणनीती आखत असला तरी त्यामुळे काही निष्ठावंतांनाही त्रास होत असल्याचा विचारही त्यांना करावा लागणार आहे. याच भूमिकेतून प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीकडेही पहावे लागणार आहे. खरंतर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीने ओवेसी यांच्या एमआयएमशी युती केली होती आणि या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रभर सभाही घेतल्या होत्या. त्यांना त्या प्रमाणात यश मिळाले नसल्याने पाच वर्षांत पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी वेगळे मित्र शोधण्यास प्रारंभ केला आहे. ज्या प्रकारे त्यांना ‘इंडिया’ आघाडीत घेण्याबाबत मतमतांतरे होती आणि हा निर्णय घेण्यामध्ये खूप विलंबही लावण्यात आला ते पाहता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या आग्रहामुळेच कदाचित त्यांचा इंडिया आघाडीमध्ये समावेश करण्यात आला असावा.
कारण महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे गट यांची सध्या राजकीय मैत्री आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला इंडिया आघाडीत घेण्याबाबत निर्णय होत नव्हता तेव्हा सर्व 48 जागा आम्ही लढवू शकतो, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. आता संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांना ‘इंडिया’ आघाडीत स्थान दिले असेल तर त्यांनाही इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात काही जागा द्याव्या लागणार आहेत. या जागा शिवसेनेच्या कोट्यातूनच द्याव्या लागतील. साहजिकच जेव्हा कोणतीही एखादी महत्त्वाची निवडणूक जवळ आलेली असते तेव्हाच छोट्या राजकीय पक्षांना आपली कामे करून घेणे शक्य होत असते. याच भूमिकेतून हे सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
मोठे राजकीय पक्ष या छोट्या राजकीय पक्षांच्या पाठबळावर निवडणुकीत मोठे यश मिळवत असतील, तर या छोट्या राजकीय पक्षांना त्यांच्या कामगिरीचे योग्य बक्षीस देणे महत्त्वाचे असते. जेव्हा लोकसभा निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये जागावाटपाचा प्रश्न समोर येतो तेव्हा मात्र या छोट्या राजकीय पक्षांचा विचार गंभीरपणे आणि प्राधान्याने केला जात नाही. विधानसभा निवडणुकीवेळी तुमचा योग्य सन्मान राखला जाईल या भरवशावर हे छोटे पक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या पाठीशी उभे राहतात. भाजप व काँग्रेस किंवा इतर राष्ट्रीय पक्षांची ही रणनीती आता या छोट्या पक्षांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी आतापासूनच आपल्या अपेक्षा व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
महादेव जानकर, सदाभाऊ खोत किंवा इतर काही मित्र पक्षांच्या नेत्यांनी भाजपबाबत आपली नाराजी लपवून ठेवलेली नाही. प्रकाश आंबेडकरही सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त करीत असतात. राजू शेट्टी यांना सर्व राजकीय पक्षांची ही रणनीती नक्की माहीत असल्याने त्यांनी कोणाशी युती न करता सर्वांना समान अंतरावर ठेवण्याचा निर्णय घेतला असावा लोकसभा निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीच्या कालावधीमध्येच छोट्या राजकीय पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढत असल्याने याच कालावधीमध्ये त्यांच्या अपेक्षाही वाढत असतात आणि या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आता त्या पक्षांशी मैत्री करणार्या राजकीय पक्षांना पेलावे लागणार आहे तरच ऐन निवडणूक काळात त्यांची नाराजी दूर होऊ शकेल.