रत्नागिरी – आम्ही केलेले बंड हे सत्तेसाठी नाही तर तत्वासाठी केले. दीड वर्षापूर्वी स्थापन झालेल्या सरकारनंतर मी राज्यभर दौरे केले. यावेळी मला सर्वांनीच भरभरून साथ दिली. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून पायाला भिंगरी बांधून राज्यभर फिरत आहे. कोकणी माणसांनी बाळासाहेबांवर, शिवसेनेवर खूप प्रेम केले, त्याची मला जाणीव आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाची आज सोमवारपासून रत्नागिरीतून सुरूवात झाली आहे. यावेळी आयोजित सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले.
आमची भूमिका चुकीची असती, तर जनतेने पाठ फिरवली असती. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा मोठं नाव असते. ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्याचे आम्ही पालन केले. बाळासाहेब ठाकरेंचे विचार हीच आमची संपत्ती आहे. बाळासाहेबांची संपत्ती आम्हाला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले. तसेच विझलेल्या मशालीचा उजेड कधी पडत नाही. सत्तेपेक्षा नाव मोठे असते आणि ते जपायचे असते. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठी एकत्र आलो आहे. आम्ही केलेले धाडस फक्त महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण जगाने पाहिले आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मुंबई, ठाणे हे शिवसेनचे शरीर जरी असले तरीसुद्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे शिवसेनेची दोन फुफ्फूस आहेत. म्हणूनच शिवसेना कोकणात वाढली. शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला आहे. जेव्हा बाळासाहेबांची भूमिका, त्यांचे विचार, निवडणूकपूर्व काळातील युतीधर्म या सगळ्यांचा विचार करून आम्ही निर्णय घेतला.