सोमाटणे – संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी १५ ते १६ लाख उसाचे रोपे तयार करून शेतकऱ्याना दिली जातात. ज्यामुळे दरवर्षी चारशे ते पाचशे एकरावर या रोपांची लागवड होते. त्यामुळे निरोगी ऊस कारखान्यावर गाळप करण्यासाठी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांनाही जास्त उत्पादन मिळते, अशी माहिती मुख्य शेतकी अधिकारी राजेंद्र वणवे यांनी दिली. यावर्षी या रोपांमध्ये वाढ होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
उसाचे रोप तयार करताना त्यावर सिड स्ट्रीटमेंट करून हे रोप तयार केले जाते. शिवाय आमच्या देखरेखीखाली रोप तयार होवून त्याची चांगली वाढ झाल्यावर आम्ही हे रोप शेतकऱ्यांना सुपूर्त करतो. त्यामुळे उत्पादन वाढते शिवाय पिकाची रोगप्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढते. पर्यायाने उसावर रोग पडत नाही गावाताची जास्त वाढ होत नाही.
यामुळे खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळते. आम्ही तयार केलेल्या रोपाची संख्या दरवर्षी वाढत जाते आहे. कारखाना गेले १५ वर्ष हा उपक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांना हे रोप देताना याची काळजी कशी घ्यावी अंतर्गत मशागत कशी करावी लावणी पुर्व आणि नंतर काय केले पाहिजे याची माहितीही तज्ञाकडून सांगितली जाते. शिवाय ज्या शेतकऱ्याला हे रोप दिले आहे त्याच्या शेताची वेळोवेळी आमच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली जाते. पुढील मार्गदर्शनही केले जाते. म्हणून जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने हे रोप आपल्या शेतात लावावे असे आवाहनही यावेळी कारखान्याच्या वतीने करण्यात आले.
मागील वर्षी पाडेगाव २६५ , ८६०३२ ,१५०१२ ,१८१३, या जातीचे जवळपास १५ लाख रोपे तयार केले होते. यावर्षी यात थोड्या प्रमाणत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय त्या दृष्टीने आम्ही नियोजनही केले आहे.
आजपर्यंत जवळपास ९ लाख रोपे तयार केले आहेत. सबंधित रोपांची पाच बाय दोनवर लागवड केली असता एकरी ५२०० रोपे लागतात. साडेचार बाय दोन वर केल्यास ५६०० रोपे लागतात. याप्रमाणे अंतर कमी जास्त केले तर रोपांची संख्या वाढते किंवा कमी होते. आम्ही दिलेल्या रोपांची लागवड दरवर्षी ५०० ते ६०० एकरमध्ये होते. शिवाय यातीलच काही क्षेत्रावरील ऊस पुन्हा लागवडीसाठी वापरात येतो. शेतकरी थेट सबंधित शेतकऱ्याच्या शेतातून तोडून घेवून जातात आणि आपल्या शेतात लागवड करतात. त्यामुळे येणारे पिक आणि मिळणारे उत्पादन या दोन्हीमध्ये फरक पडतो आहे.
आम्ही दिलेले रोपे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्याने उसाला उतार चांगला मिळतो. शिवाय उत्पादन चांगले मिळते. शेतकऱ्याला फवारणी, गावात काढणी अशा प्रकारच्या मशागातीवर जास्तीचा वेळ आणि पैसा खर्च करावा लागत नाही.
– साहेबराव पठारे, कार्यकारी संचालक, संत तुकाराम साखर कारखाना कासारसाई.
जे आमचे रोप घेवून शेतकऱ्यांनी शेती केली तर त्याला पेरणी पुर्व व नंतरच्या मशागतीचे सर्व मार्गदर्शन मिळते शिवाय उत्पादन वाढते त्यामुळे चार पैसे शेकतरी जास्त कमावतो.
– बापूसाहेब भेगडे, उपाध्यक्ष, संत तुकाराम साखर कारखाना कासारसाई