पुणे – राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे. देशाला अन्न पुरवणारा शेतकरी आत्महत्या करत आहे. १० दिवसात २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु एवढ्या मोठ्या देशाला कृषी मंत्री नसल्याचे सांगत राष्ट्रवादी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी आणि कांदा प्रश्नाकडे सध्याचे सरकार दुर्लक्ष करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचा पुण्यात शनिवारी समारोप झाला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार संजय जगताप, अशोक पवार, रवींद्र धंगेकर, काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशाची भूक भागविणारा शेतकरी आत्महत्या करतो, ही गोष्ट छोटी नाही. मी कृषिमंत्री असताना शेतकरी आत्महत्याची घटना घडली होती. तेव्हा प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना घेऊन लातूर, यवतमाळ आणि वर्ध्याला गेलो होतो. तिथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर दिल्लीला गेल्यावर लगेच शेतकरी कर्ज माफी जाहीर केली. अमोल कोल्हे आणि सहकाऱ्यांनी काढलेला आक्रोश महाराष्ट्रापुरता सीमित राहिला नाही. देशभर पोचला आहे. त्यातून एक प्रकारची जागृती झाली आहे.
परिस्थिती सुधारली नाही तर हल्लाबोल मोर्चा
बाळासाहेब थोरात म्हणाले, आक्रोश मोर्चानंतर परिस्थिती सुधारली नाही, तर हल्लाबोल मोर्चा काढावा लागेल. केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी आणि इथेनॉल उत्पादन बंदीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रोश एवढ्यापुरता मर्यादित राहू नये. सरकारने शेतकऱ्याच्या खिशात हात घालू नये. सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट आणि जुमलेबाज असल्याचा आरोप केला. तर कोल्हे यांनी कांदा निर्यातबंदीवरुन राज्यातील सरकारमधील एकाने ही केंद्र सरकारला विचारणा केली नसल्याची टीका केली.
अजित पवारांना संजय राऊतांचा इशारा
अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांना पाडणारच, असे विधान केले होते. यावर संजय राऊत यांनी भाषणात म्हणाले, हवा बहुत तेज चल रही है, अजितराव. टोपी उड जायेगी, असे सांगून शिरूरमध्ये कोल्हेंचीच हवा असल्याचे सांगितले. आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल, तर आधी तुम्ही पडाल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.