ऊरुळी देवाची : टँकरच्या पाण्यासाठी जीवघेणी धावपळ करताना नागरिक.
फुरसुंगी – पुणे महापालिकेने ऊरुळी देवाची परीसरातील नागरीकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून जलवाहिन्यांची कामे केलेली आहेत. मात्र, या जलवाहीन्यांना पाणीच येत नसल्याने या वाहिन्या धुळखात पडल्या असून त्यांना गंज चूढ लागला आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला तरी पालिकेबाहेर पडलेले गाव म्हणून दुजाभाव करीत टँकरची संख्याही कमी करण्यात आली आहे. महापालिकेच्या अशा कारभारामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पुणे महापालिकेच्या फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोमुळे या परिसरातील सर्व नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित झाल्यामुळे गेल्या 18 वर्षांपासुन ऊरुळी देवाची व फुरसुंगीकर पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येशी झगडत आहेत.अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणांद्वारे पालिकेकडे मागणी करीत आहेत. त्यानंतर महापालिकेत समोवश झाल्यानंतर पालिकेने उरुळी व फुरसुंगी गावाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे मान्य केले. त्यानुसार दोन्ही गांवाच्या परीसरात कोट्यवधी रुपये खर्च करून लोखंडी जलवाहिन्या टाकण्यात आल्या.
मात्र, टाकण्यात आलेल्या बहुतांशी जलवाहिन्यांत अद्यापही पाणी आलेले नाही. तर काही ठिकाणी येणारे पाणी खूपच अपुरे तसेच अनियमित असल्याने येथील नागरीकांना पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून रहावे लागत आहे. फुरसुंगी आणि उरूळीदेवाची ही दोन्ही गावे वाढीव मिळकतकराच्या मुद्यावर पालिकेतून बाहेर पडल्यानंतर महापालिकेकडून या गावांच्या मूलभूत प्रश्नांकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
यातून या गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेचे पाण्याचे टँकरची संख्याही कमी झाली आहे. याच कारणातून गावात टँकर आला की हंडाभर पाण्यासाठी टँकरभोवती मोठी गर्दी होत आहे. सर्वसामान्य जनता पाण्यासाठी हैराण झाली असून पाण्यासाठी दाहीदीशा अशी अवस्था झाली आहे.