सनई, ताशा, संबळ, हलगी, डफ वाद्यांचा सूर कानी
चिंबळी – डिजिटल साउंड सिस्टीमवर निर्बंध असल्याने तसेच ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी लग्नसमारंभ, यात्रा-जत्रांमध्ये पारंपरिक वाजंत्री मंडळींना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. तुळशीविवाह सण झाल्यानंतर लग्नसराईची धामधूम सुरू झाली असून, वाजंत्री मंडळींना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.
तुळशीविवाह सोहळा पार पडला. त्यानंतर मोठ्या संख्येने लग्नकार्ये पार पडण्यास सुरुवात झाली आहे. लग्नसराईचा यंदाचा हंगाम धडाक्यात सुरू झाला आहे. पोलिस प्रशासनाने डिजिटल साउंड सिस्टीमवर निर्बंध घातल्यामुळे पारंपरिक वाजंत्री मंडळींना लग्नसराईच्या काळात मोठी मागणी आहे. परिणामी लग्न समारंभात पूर्वीप्रमाणे सनई, ताशा, संबळ, हलगी, डफ अशा पारंपरिक वाद्यांचा सूर कानी ऐकू येत आहे. गेल्या चार-पाच वर्षांत पारंपरिक वाजंत्रींची मागणी वाढत असल्याचा नवा ट्रेंड दिसतो आहे.
पारंपरिक वाजंत्री मंडळींना वर्षभरात केवळ लग्नसराईचा हंगाम मिळतो. यामध्येच ते कमाई करू शकतात. अलीकडच्या काळात वाजंत्री कलाकारांना चांगले पैसे मिळत आहेत. एका दिवसाची लग्नाची सुपारी 18 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत घेतली जात आहे. मागणी वाढल्याने वाजंत्री कलाकारांनी आपल्या चमूचे अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. वाजंत्री कलाकारांच्या एका ताफ्यात सहा ते सात वाजंत्री कलाकार असतात. ताफ्यातील सर्व कलाकारांना एकसारखा पोशाख, स्वतंत्र वाहनाची व्यवस्था असे बदल करून अधिक कालसुसंगत होण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतो आहे. साहजिकच लग्न समारंभांमध्ये वाजंत्री मंडळींचे आकर्षण वाढते आहे.
2024 मधील तारखाही बुक
लग्नसराईत सध्या आम्हाला चांगली मागणी आहे. अनेक वाजंत्री कलाकारांच्या 2024मधील तारखाही आताच आरक्षित झाल्या असल्याचे वाजंत्री कलाकारांनी सांगितले.
लोककला जोपासण्यासाठी…
यात्रा-जत्रा, लग्न म्हटले की, वाजंत्रीशिवाय शोभा नाही, असा काहीसा समज आहे. लग्नसराईच्या काळातील केलेली कमाई या वादकांना वर्षभर पुरतेच असे नाही. मात्र, पारंपरिक लोककला जिवंत रहावी म्हणून वाजंत्री मोजक्या रकमेवर सुपारी घेऊन आपली कला जोपासत असतात. गेल्या काही वर्षांपासून लग्नाचा थाट बदलला आहे. लग्नात वर्हाडी मंडळींची संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. लग्नाच्या वरातीसाठी आलेल्या आधुनिक बॅण्ड, बेंजो, डीजेच्या दणदणाटात ही पारंपरिक वाद्य आणि वाजंत्री प्रकार काळाच्या ओघात लोप पावल्यासारखी स्थिती निर्माण होत असल्याने काही कलाकारांकडून लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.