तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या वतीने आरक्षण वाचवण्यासाठी शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करीत तहसीलदारांना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू नये, असा इशारा दिला. सरकारने आरक्षणाची मागणी करीत असलेल्या समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करुन त्यांना आरक्षण द्यावे. परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये व जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
शिरुर तालुका माळी महासंघ आणि ओबीसी संघटना यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माळी महासंघांचे राष्ट्रीय महासचिव मुरलीधर भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष जयवंत भाकरे, बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष बापूसाहेब कुदळे, निमगावचे माजी सरपंच राजेंद्र विधाते, शिरूर तालुका माळी महासंघांचे अध्यक्ष विजय खेडकर, उपाध्यक्ष नवनाथ खरपुडे, सचिव अनिलकुमार अभंग,
किसान आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय भुजबळ, सहकार आघाडी अध्यक्ष सुहास भुजबळ, कार्याध्यक्ष बाबाजी रासकर, महिला आघाडी अध्यक्षा मंदाकिनी कळमकर, सुवर्णा भुजबळ, कमल भुजबळ, लक्ष्मी भुजबळ, निर्मला भुजबळ, आनंदराव गायकवाड, लक्ष्मण कळमकर, रवींद्र राऊत, विकास जायकर, रमाकांत खंडे, रवींद्र कांबळे, प्रवीण कांबळे, संपतराव आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारने गडबड केल्यास तीव्र आंदोलन
आमचा कुठल्याही समाजाला आरक्षणासाठी विरोध नाही. सरकारने त्यांचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करुन त्यांना आरक्षण द्यावे, यासाठी आमचा नेहमीचा पाठिंबा असणार आहे. परंतु ओबीसी समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये, अशी मागणी आहे. यामध्ये सरकारने काही गडबड केल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे माळी महासंघाचे प्रदेश सचिव चंद्रशेखर दरवडे यांनी आंदोलनादरम्यान सांगितले.