प्रवासी महामार्गावरच तिष्ठत : अपघाताचा धोका
प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्यास प्रशासन असमर्थ
चाकण – पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन्ही बाजूला प्रवाशांसाठी बसथांबा शेडची मागणी गेली कित्येक वर्षांपासून नागरिकांकडून होत आहे आणि ती अद्यापही पूर्ण करण्यात प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.
निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये तिष्ठत उभे राहावे लागते. काही प्रवासी तर धोकादायकरीत्या महामार्गावरील दुभाजकांवर उभे राहून वाहनांची वाट पाहतात, त्यांच्यामुळे सर्व्हिस (सेवा )रस्त्यावरून जाणार्या वाहनांनाही अडथळा होतो. अशावेळी वेगाने आलेल्या वाहनांपासून अपघाताचा धोका होण्याचा संभव असतो. तसेच तळेगाव चौकातील सिग्नलजवळ महामार्गावर भीक मागणार्या अल्पवयीन मुलांचा व भिकार्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तळेगाव चौक येथील सिग्नलजवळ भिकारी व त्यांची अल्पवयीन बालके रस्त्यावर धोका पत्करून गाड्या थांबताच भीक मागण्यासाठी आडवी तिडवी पळत असतात, कधी वाहनांना आडवे जाऊन तर कधी दुभाजकावरून पळत असतात, यातून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
मजूर अड्ड्याजवळही सारखीच स्थिती
पुण्याकडे जाणार्या रस्त्यावरील मजूर अड्ड्याजवळील बस थांबा गायब झाला असून नाशिककडे जाणार्या रस्त्यावर वाहने सिग्नल जवळच थांबत असल्याने या रस्त्यावरील बस थांबा प्रवासी वापरात नाही. काही लोक या थांब्याचा वापर पथारी दुकानासारखा करीत आहेत.
अतिक्रमणे झाली उदंड
तळेगाव चौकातील पोलीस चौकी, मजूर अड्डा व नाशिक रस्त्यावर सवेरा हॉटेल समोर मोठ्या स्वरूपाचे बसथांबे टाकण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. या रस्त्यावरील थांब्यावर कामगार व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यातच सेवा रस्त्यावर टपर्या, हातगाड्या व अवैध वाहनांनी अतिक्रमण केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.