सांगली – जाती व्यवस्थेविरूध्द साहित्यिकांनी आज बोलण्याची गरज आहे. शाळेत खिचडी वाटप करीत असतानाही जात नोंदवणे ही विकृती आहे. यातून भयानक भविष्य निर्माण होईल, असे वक्तव्य भाष्यकवी रामदास फुटाणे यांनी केले. कवी भीमराव धुळूबुळू यांच्या “काळजाचा नितळ तळ’ या काव्य संग्रहाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
रामदास फुटाणे म्हणाले, आज स्वातंत्र्याला शंभर वर्षे झाली तरी जात नोंदवली जाते. या व्यवस्थेविरूद्ध साहित्यिकांनी उघडपणे बोलण्याची आणि लिहिण्याची आज गरज आहे. याबाबत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काहीच बोलत नाहीत, ही शोकांतिका असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी महेश कराडकर यांनी स्वागत केले, तर प्रतिभा प्रकाशनचे धर्मवीर पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी चित्रकार अन्वर हुसेन, रवि बावडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.