सातारा – यशवंतराव चव्हाण ते मनोहर जोशी या मुख्यमंत्र्यांपर्यत राजकारणातील सुसंस्कृतपणा टिकून होता. मात्र, दुर्देवाने सध्याच्या राजकारणात सुसंस्कृतपणा टिकून राहिला नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक व कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. दरम्यान, माझी जात व धर्मापेक्षा माझा देश सर्वोच्च आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. परंतु, आता देश विचित्र दिशेने चालला असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने आयोजित २३ वा जिल्हा ग्रंथ महोत्सव जिल्हा परिषदेच्या मैदानावर नाटककार डॉ. विश्वास मेहेंदळे नगरीत चार दिवस रंगला होता. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. फुटाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. अशोक भोईटे होते. यावेळी ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष प्रा. डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्रा. प्रमोदिनी मंडपे, माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, डॉ. राजेंद्र माने व समितीचे सदस्य उपस्थित होते.
रामदास फुटाणे म्हणाले,‘‘प्रत्येकाने वाचन संस्कृतीत रमले पाहिजे. जी माणसे पुस्तके वाचतात त्याची निर्णयक्षमता चांगली असते तर, काय स्वीकारावे व काय नाकारावे हे त्यांना लवकर उमजते. दरम्यान, केंद्र सरकारने आरक्षण दिले तरी सगळ्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत. त्यामुळे जगण्याचे पर्याय स्वत:ला निर्माण करता आले पाहिजेत.’’ राजकारणात सुसंस्कृत पणाची परंपरा लोप पावली असून जाती जातीच्या संदर्भाने राजकारण सुरू आहे. तरूणांनी ग्रंथांमध्येच आयुष्य सिध्दीचा मार्ग शोधावा, असे ते म्हणाले .
डॉ. अशोक भोईटे म्हणाले,”देशाच्या प्रगतीत ग्रंथालय चळवळींचे मोठे योगदान आहे. जीवनात वाचनाला खूप महत्व असून वाचनाचे संस्कार खऱ्या अर्थाने घरात झाले पाहिजेत. वाचनाने विचारांची उंची वाढून माणूस संस्कारशील बनत आहे.’’
प्रा. डॉ. यशवंत पाटणे म्हणाले,‘‘सध्याच्या काळात मूल्यहीन राजकारामुळे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मागे पडले आहेत. धार्मिक राजकारणामुळे दोन मने दुभंगली असून सध्याचा समाजाला साहित्यिक वाचवू शकतात. या काळात समाजमन चांगले ठेवायचे असल्यास पुस्तकाशिवाय पर्याय नाही.’’
शिरीष चिटणीस म्हणाले,‘‘संकट काळात प्रत्येकाला पुस्तके धीर देत असून पुस्तकेच संकटमोचक आहेत. स्वातंत्र्य काळात झालेले लिखाण देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरले आहे. वाचन संस्कृतीला बळ देणारे काम ग्रंथ महोत्सव देतात.”
सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले.