Sanjay Raut : ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी ‘मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही,’ अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली होती. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भाजपवर देखील निशाणा साधला आहे. “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांची औकात काय? बेकायदेशीर पद्धतीनं एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. शिवसेनेला संपवण्याचं भाजपचं स्वप्न आहे, त्यासाठी आमच्या लोकांना फोडून त्यांना आमने-सामने आणले आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
“खरी शिवसेना आणि खरे शिवसैनिक काय ते रविवारी मुंब्य्रात पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे मुंब्र्यांत गेल्यानंतर जवळपास संपूर्ण मुंब्रा आणि ठाणं रस्त्यावर उतरलं होतं. मुंब्रातील शिवसेनेच्या शाखेबाबत कायदेशीर प्रक्रियाही सुरू राहील. शाखेचे सर्व कागदपत्र शिवसेनेकडे (ठाकरे गटाकडे) आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना नाही, ही गँग आहे. चोरांची टोळी आहे. सर्वोच्च न्यायालयानंही असंच म्हटलं आहे.” असे संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांची औकात काय? बेकायदेशीर पद्धतीनं एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. शिवसेनेला संपवण्याचं भाजपचे स्वप्न आहे, त्यासाठी आमच्या लोकांना फोडून त्यांना आमने-सामने आणलं आहे. त्यांनी ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमचे काही लोक तोडून नवं सरकार स्थापन केलं आहे. आमच्याच लोकांना आमने-सामने उभं करत मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम भाजपनं केले आहे.”
“31 डिसेंबरनंतर तुमचं मुख्यमंत्रीपद जाऊ देत मग तुमचा बार कुठून उडेल ते पाहा. मुंब्य्राला आम्ही गेलो, तेथे हजारो शिवसैनिक रस्त्यावर होते. पोलिसांनी अडवलं, तुमच्याकडे सत्ता नसती तर चित्र वेगळं दिसलं असते, दिवाळी असल्याने आम्ही संयम राखला, याचे उपकार मानले पाहिजेत. शिंदे आत्ताच भाजपमध्ये गेले आहेत. तुम्ही जर त्यांची अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच दिसेल. त्याशिवाय ते मुख्यमंत्रीपदी राहूच शकत नाही. आताच ते गुलाम झाले आहेत आणि गुलामांना स्वतःचं मत आणि स्वाभिमान नसतो,” अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.