अटकपूर्व जामिनाची तरतूद रद्द होणार
बिहारशरीफ, दि. 8 – अटकपूर्व जामिनाची तरतूद रद्द करण्यासाठी व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनास अधिक अधिकार मिळण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक विधेयक मांडील, असे केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री धनिकलाल मंडल यांनी काल जाहीर केले. बिहार पोलीस संघटनेची 28वी परिषद राजगीर येथे झाली, तीत मंडल बोलत होते.
ते म्हणाले, की ब्रिटिशांनी तयार केलेली पोलीस प्रशासनाची चौकट सध्याच्या परिस्थितीला योग्य अशी नाही. एखाद्या संशयित आरोपीला पोलीस ताब्यात घेण्यासाठी जात असल्यास संबंधित आरोपी आपले वजन वापरून अटकपूर्व जामीन मिळवतो. त्यामुळे पोलिसांच्या कामात एकप्रकारे अडथळा निर्माण होतो.
बांगलादेशातून निर्वासित येत असल्याचा इन्कार
नवी दिल्ली – वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांनुसार बांगलादेशातून भारतात निर्वासित येत असलेल्या वृत्ताचा परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्त्याने इन्कार केला आहे. हा प्रवक्ता पुढे असेही म्हणाला की, भारत सरकारचे आपल्या सीमेवर सातत्याने लक्ष आहे. काही लोक भारतीय हद्दीत आले होते. परंतु त्यांना परत पाठविण्यात आले.
भाषाविषयक धोरण कायम आहे
नवी दिल्ली – सरकारच्या भाषाविषयक धोरणात काहीही बदल झालेला नाही. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा सरकारी कार्यालयात वापर चालूच राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रादेक्षिक भाषांच्या विकासाकडेही जरूर ते लक्ष दिले जाणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री चरणसिंग यांनी जाहीर केले.