– अरुण गोखले
विद्या विनयेन शोभते- हे आपण वाचतो, ऐकतो प्रसंगी इतरांना त्याचा बोधही करतो. पण आपण जे दुसऱ्याला सांगतोय ते ज्ञान मात्र आपल्या जर आचरणात नसेल, तर ते केवळ आपल्या डोक्यावरचे ओझेच नाही का? “मी ज्ञानी, मी शहाणा, जे काही समजतेय ते फक्त मलाच’, असं जे आपल्याला वाटत असते ते आपल्या डोक्यावरचे पुस्तकीज्ञानाचे ओझे. त्या ज्ञानाचं ओझं आपण उगाच डोक्यावर मिरवित आहोत, याची कित्येकांना कल्पनाच नसते. कित्येक जणांना तर मीच ज्ञानी, मीच शहाणा, जे काही कळतेय समजतेय, ते फक्त मला असा वृथा अभिमान, गर्व आणि ताठा असतो.
आपण जर बारकाईने सभोवतालच्या लोकांचं, त्यांच्या मानसिकतेचं निरीक्षण केलं तर आपल्या असे लक्षात येते की सध्या जगात प्रत्येक माणूस हा त्याच्या डोक्यावर कसले ना कसले तरी ओझे घेऊन मिरवतो आहे. मग ते त्याने स्वत:च्या डोक्यावर घेतलेले ओझं हे मोठेपणाचे असेल, श्रीमंतीचं असेल, बडेजावाचं असेल, नाहीतर अगदी ज्ञानाचंही असेल.
विद्येला विनयाची जोड न देता जर आपण त्या ज्ञानाचा मोठेपणा, गर्व मिरवीत असलो तर ते ज्ञानाच एक प्रकारे ओझं वाहिल्या सारखंच आहे. हा असा ज्ञानाच्या ओझ्याचा भार आपण आपल्या डोक्यावर घेऊ नये ही गोष्ट तर फार पूर्वीपासून आपल्या साधू, संतांनी सांगून ठेवली आहे. विद्वत्तेच्या जोरावर ज्ञानाचा बाजार मांडणाऱ्या आणि आपण ज्ञानी असल्याचे मिरवणाऱ्या पढत पंडितांना तुकोबा हेच म्हणतात की –
व्यर्थ भार विद्येचा का शिरी वाहता रे।
मानवात ईश्वर आहे का न जाणता रे?
आपण पोथ्या पुराणे वाचली, ग्रंथ वाचले, संतांची वचने पाठ केली; पण त्याचा बोध, त्यांची शिकवण, जीवन संदेश हे प्रत्यक्ष कृतीत, आचरणात आणले नाहीत तर ते कोरडे ज्ञान हे तुमच्या डोक्यावरचे ओझेच नाही का? संत सांगतात की, बाबांनो! खरं ज्ञान ते आहे जे आचरणात उतरते. जे तुम्हास माणूस म्हणून जगायला आणि इतरांना जगवायला शिकविते. परस्परांशी मैत्री, प्रेम, सलोखा बाळगायला शिकवते, ते खरे ज्ञान आहे. माणूस जीवनात जे व्यावहारिक ज्ञान कमवितो त्याने त्याचे फक्त पोट भरते. कारण ते ज्ञान हे केवळ त्याच्या उदरभरणाचे साधन असते. पण माणसाच्या जीवनाची खरी सार्थकता ही आत्मज्ञानात आहे, हे लक्षात घ्या.