शेवगाव – चालु वर्षी उसाला प्रतिटन 3100 रुपये भाव द्यावा व मागील वर्षाचे 300 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात लगेच जमा करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊसउत्पादकांनी केली. दि. 10पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास दि. 15पासून ऊसतोड, तसेच वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी साखर कारखानदार व प्रशासनाला दिला.
या संदर्भाचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगडे यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखानदारांना साखर व अन्य उपपदार्थापासून गेल्या वर्षी प्रति टन पाच हजार 400 रुपये इतके उत्पन्न मिळाले असून यावर्षी देखील चांगला भाव मिळणार असल्याने चालू गळीत हंगामासाठी ऊसाला प्रतिटन पहिली उचल 3100 रुपये मिळावी व मागील हंगामातील साखरेतील व उपपदार्थांमधील वाढलेल्या दराचा फरक म्हणून 300 रुपये दिवाळीच्या सणासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर लगेच वर्ग करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी संघटना व ऊसउत्पादक गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करीत आहे.
परंतु ऊस कारखानदारांनी अद्याप त्याची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांमध्ये त्याचा मोठा रोष आहे. त्यातच चालू गाळपासाठी जाणाऱ्या उसाचा भाव जाहीर न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्याचा उद्रेक होऊ नये. म्हणून चालू हंगामातील ऊसाची पहिली उचल 3100 रुपये दि.10 नोव्हेंबरच्या आत जाहीर करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी दि. 15 नोव्हेबरपासून ऊसतोड व वाहतूक बंद करतील.
मागील सलग दोन वर्षांपासून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळे कारखानदारांना मोठा लाभ झाला आहे. त्यातच साखर, मळी, इथेनॉल, मॉलिसिस व वीज यांचे दर वाढलेले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात कारखानदारांना लाभ झाला आहे, पण शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला गेला नाही.त्यामुळे स्वाभिमानी संघटना व ऊस उत्पादकांनी हा निर्णय घेतला आहे.
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, मच्छिंद्र आरलें बाळासाहेब फटांगडे, मेजर अशोक भोसले, प्रशांत भराट, अमोल देवढे, युवक अध्यक्ष हरिभाऊ कबाडी, दादासाहेब पाचरणे, विकास साबळे, नानासाहेब कातकडे, नारायण पायघन आदी उपस्थित होते.