राहाता -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांनी केलेले विधान आश्चर्यकारक असून, या गोष्टीचे एवढे भांडवल करण्याची आवश्यकता नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात स्कॅम मास्टर सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर काय करीत होते? याचाही खुलासा कधीतरी संजय राऊत केला पाहिजे, अशी खोचक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात अनेक स्कॅम झाले. या स्कॅममधील अनेक जणकधी मातोश्री तर कधी वर्षावर आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर दिसत होते.
त्यामुळे नागरिकांबरोबर भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचीच माहिती मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना नसते. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेलेल्या व्यक्तिबाबत एवढे भांडवल करण्याची आवश्यकता नाही. याबाबत कोणतेही तथ्य नाही, जर काही असेल तर त्याची कारवाई होईल, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात सचिन वाझे कुठे कुठे फिरत होते.
खंडणी गोळा करायचे टार्गेट त्यांना कोणी दिले होते, याबाबत संजय राऊत गप्प का? असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हलगर्जीपणामुळेच गेल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी केला.