हिंजवडी – शेतकऱ्यांच्या उसाला प्रति मेट्रिक टन 3300 रुपये भाव द्यावा, कारखान्याच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच सन 2011-12 सालातील राहिलेले प्रतिटन 200 रुपये व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, आशा अनेक मागण्यांसाठी कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा किसान युनियन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने संत तुकाराम साखर कारखान्यावर धडक मोर्चा काढण्यात आला.
कारखान्याच्या 26 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या दिवशीच विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा असल्याने कारखाना परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. कारखाना कार्यस्थळावरील श्री संत तुकाराम महाराज मंदिरापासून घोषणाबाजी करत निघालेल्या मोर्चाचे कारखान्याच्या प्रवेशद्वारावर सभेत रुपांतर झाले. यावेळी घोषणा देण्यात आल्या.
या वेळी माऊली दाभाडे यांनी संत तुकाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेसाठी प्रसारित केलेल्या ताळेबंद अहवालामध्ये दिलेला 8 कोटी निव्वळ नफा व 2 कोटींची आयकर भरण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची केलेली घोर फसवणूक असल्याचा आरोप केला. वास्तविक पाहता साखर उद्योगाला आयकर माफ असून साखर कारखान्याला सहवीज प्रकल्पातून देखील 14 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. अशा एकूण 24 कोटी रुपयांचा हिशेब ताळेबंद अहवालात मांडण्यात आला आहे. तसेच 30 रुपये क्विंटलप्रमाणे अथवा तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दराने साखर विक्री होत असताना साखर कारखाना 2634 रुपये एवढाच नाममात्र भाव देत आहे.
मग 3700 रुपये टनाने 2 लाख टन साखर विक्री केल्याने एकूण 14 कोटी रुपये अधिकचे प्राप्त होतात असे एकूण 38 कोटी रुपये अतिरिक्त प्रमाणात साखर कारखान्याकडे जमा होतात तसेच मागील बारा वर्षांचे 200 रुपये प्रत्येक टनाला कारखान्याकडून शेतकऱ्यांना येणे आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना प्रत्येक टनाला साखर कारखान्यांनी 3300 रुपये प्रति मे. टन भाव मान्य करून दिवाळी पूर्वी रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी मुळशी, मावळ, खेड, शिरूर, हवेली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोर्चाला उपस्थित होते.