नवी दिल्ली – एका 89 वर्षीय व्यक्तीने 27 वर्षांपूर्वी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र 60 वर्षांपेक्षा जास्त काळ संसार करणाऱ्या या जोडप्याच्या घटस्फोटास मंजुरी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
1963 साली निर्मलसिंह पनेरसर यांचा विवाह परमजीत कौर पनेरसर यांच्याशी झाला होता. 1984 पासून आमचे नाते संपुष्टातच आले होते, असे निर्मलसिंह यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते.
निर्मलसिंह त्यावेळी भारतीय हवाईदलात चेन्नई येथे तैनात होते. तथापि, त्यांच्या पत्नीने त्यांच्यासोबत तेथे जाण्यास नकार दिला होता. क्रूरतेचा आरोप करत निर्मल यांनी 1996 मध्ये पहिल्यांदा पत्नीविरूध्द दावा दाखल केला होता. 2000 मध्ये जिल्हा न्यालयाने त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती व ती त्याच वर्षी फेटाळण्यात आली होती. तब्बल दोन दशकांनंतर त्यांचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले. आता तेथे त्यांची घटस्फोटाची मागणी फेटाळण्यात आली आहे.
भारतीय समाजात अजूनही विवाह हे पती आणि पत्नी यांच्यातील पवित्र,अध्यात्मिक,आयुष्यभराचे भावनात्मक बंधन मानले जाते. घटस्फोटीत महिला हा कलंक माथी घेऊन मरण्याची आपली इच्छा नसल्याचे परमजीत यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या घटस्फोटाला संमती दिली तर तो परमजीत यांच्यावर अन्याय होईल असे न्यायालयाने नमूद केले. आपण या पवित्र नात्याचा आदर करण्याचे सगळे प्रयत्न केले आणि या उतारवयातही पतीची देखभाल करण्याची आपली तयारी असल्याचे परमजीत यांचे म्हणणे असल्याचे न्यायालयाने नमूद करत घटस्फोट नामंजुर केला.
भारतात आजही घटस्फोटाच्या घटनेकडे वेगळ्या नजरेने अथवा लांछनास्पद प्रकार म्हणून पाहिले जाते. या जोडप्याबद्दल एक विशिष्ट ग्रह जोपासला जातो. शंभरपैकी एका जोडप्याचा किंवा कदाचित त्यापेक्षा अधिकही संख्या असू शकते घटस्फोट होतो. मात्र या प्रकाराला कुटुंब व्यवस्था जपणाऱ्या आणि मानणाऱ्या भारतीय समाजात एक अप्रिय आणि लाजीरवाणा प्रकार म्हणूनच पाहिले जाते.