जळोची – अजितदादा तुम्ही 70 हजार कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात, आम्ही कोणाकडे जायचे? असा खळबळजनक आरोप थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तरडोली (ता. बारामती) येथील आंदोलक विजय भोसले यांनी केल्याने बारामतीत चर्चेचा विषय ठरला आहे.
बारामती तालुक्यातील तरडोली येथे दुधाला दर मिळावा या मागणीसाठी तरडोली गावातील उपसरपंच सागर जाधव हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली तरडोली ग्रामस्थांच्या वतीने पुणे-बारामती रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोको दरम्यान आंदोलक विजय भोसले यांनी वरील खळबळजनक आरोप केला आहे.
आम्ही कोणतेही काम पवाराकडे घेऊन गेलो तर ते सांगतात की, राज्यातील सूत्र अजित पवारांकडे दिली आहेत. कोणत्याही गाव पुढाऱ्यांना विचारल्यावर ते म्हणतात की, हे प्रश्न दादाच सोडवू शकतात. पण दादा आपला कुठलाच प्रश्न मार्गी लावणार नाहीत. असा उद्विग्न सवाल उपस्थित करून विजय भोसले या युवकाने जागे व्हा. सावध व्हा. आज नरडीला आले आहे. दूध संस्था उचल देत नाहीत. असे म्हणत त्यांनी रोष व्यक्त केला.
बारामतीच्या राजकारणात खळबळ
अजित पवार तुम्ही 70 हजार कोटी वाचवण्याऐवजी 70 लाख रुपये पुरंदर उपसाला सोडले असते तर तळे भरले असते अन् गावातील पाण्याचा प्रश्न सुटला असता, असेही विजय भोसले यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळ्या प्रकारचा दबदबा, वजन असल्याचे सर्वांनाच परिचित आहे. त्यांच्याबाबत बोलताना अनेक राजकीय नेते, पदाधिकारी विचार करूनच बोलतात. मात्र चक्क बारामतीतीलच एका युवकाने अजित पवारांवरच निशाणा साधला असून, त्यांच्यावर गंभीर आरोप केला असल्याने बारामतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.