हॅंगझोऊ :- हॅंगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा विजयी प्रवास सुरूच आहे. पूल-अ मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा 6-0 असा पराभव केला. या विजयासह सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठण्याचा दावा बळकट केला आहे.
भारताने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकमधून दोन गोल केले, तर चार मैदानी गोल केले. या सामन्यात भारताकडून वैष्णवी, निशा, दीप ग्रेस इक्का, मोनिका, संगीता आणि लालरेमसियामी यांनी गोल केले.
टीम इंडियाने पूल-ए च्या पहिल्या सामन्यात सिंगापूरचा 13-0 असा पराभव केला होता. आता संघाने सलग दुसरा विजय संपादन केला. त्याचवेळी मलेशियाने पहिल्या पूल सामन्यात हॉंगकॉंगचा 8-0 असा पराभव केला होता. भारतीय महिला हॉकी संघाचा पुढील सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे.