जळगाव – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून एक जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये नायब तहसीलदार, संगणक चालक, कारकून, लिपीक, शिपाई पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. मात्र केवळ तीन महिन्यांसाठी ही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास पुढील तीन महिने नोकरी कायम राहील, असे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. मात्र या भरतीसाठी केवळ सेवानिवृत्त अधिकारी अर्ज करू शकतील. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाच भरती केले जाणार आहे.
नायब तहसीलदार पद कंत्राटी पद्धतीने भरले जात असल्याची जाहिरात पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. संबंधित जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या जाहिरातीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. तहसीलदार पदासारखी जागा कंत्राटी पद्धतीने भरली तर आम्ही करणार काय? असा सवाल विद्यार्थ्यी उपस्थित करत आहेत.
जाहिरातीत काय म्हंटले आहे ?
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये 1) लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी, जळगाव, (2) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव (3) सक्षम अधिकारी, तथा उप विभागीय अधिकारी, भुसावळ भाग, भुसावळ (4) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर (5) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा आणि (6) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगांव या कार्यालयांतील पुढील पदांवर मासिक मानधन तत्वावर कामकाज करण्यासाठी केवळ तात्पुरता स्वरुपात 6 महिन्यांचे (प्रथम 3 महिने आणि आवश्यकता असल्यास पुढील 3 महिने) कालावधीसाठी पुढील अटी-शर्ती बंधनकारक ठेवून पात्र सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी आणि उमेदवारांची नियुक्ती करायची आहे, असा मजकूर सदर जाहिरातीत आहे.
जळगावचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
सदर जाहिरातीनंतर उडालेला गोंधळ पाहून जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या जाहिरातीवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “मला मदत करण्यासाठी, माझे कोर्ट-कचेरीच्या कामांना सहकार्य करण्यासाठी, माझे प्रश्न समजून घेण्यासाठी, ऑर्डरची ड्राफ्टिंग करण्यासाठी आपण नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी जाहिरात काढली आहे. ही जाहिरात काढण्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेण्यात आली आहे”.
काॅंग्रेस नेते नाना पटोले काय म्हणाले ?
शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यापारी यांचे आयुष्य उद्ध्वस्थ केल्यानंतर आता अधिका-यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसिलदार व नायब तहसिलदार पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तात्काळ रद्द करुन सरकारने नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड –
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सरळ सेवा भरती कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड झाला. सरकारचा सरळ सेवा भरती कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय ताजा असताना जळगावमध्ये नायब तहसील दार पद कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नायब तहसीलदार कंत्राटी पद्धतीने भरणे आहे.
आरक्षणामुळे गुणवत्तेच्या नावाने शंख करणारे काय दिवे लावत आहे ते दिसून येत आहे. आता हा नायब तहसीलदार मंत्री महोदयांचा कार्यकर्ता न निघो!
अजब खोकेबुद्धी…#कंत्राटीकरण_रद्द_करा #कंत्राटी_तहसीलदार pic.twitter.com/5F6qQEv8W7— AAP महाराष्ट्र (@AAPMaharashtra) September 29, 2023
आप महाराष्ट्रचे काय म्हणणे आहे ?
नायब तहसीलदार कंत्राटी पद्धतीने भरणे आहे. आरक्षणामुळे गुणवत्तेच्या नावाने शंख करणारे काय दिवे लावत आहे ते दिसून येत आहे. आता हा नायब तहसीलदार मंत्री महोदयांचा कार्यकर्ता न निघो! अजब खोकेबुद्धी… अशी प्रतिक्रिया ‘AAP महाराष्ट्र’ या एक्स हॅडलवर देण्यात आली आहे.
(Recruitment of Tehsildar posts in Jalgaon district on contract basis)