नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची फसवणूक केली आहे आणि ही बाब आता लोकांच्या पक्की ध्यानात आली आहे,म्हणून आगामी निवडणुकीत मोदी सत्तेवरून जाणार हे आता निश्चीत झाले आहे असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. जी 20 परिषदेतून भारतातील सर्वसामान्यांना काय फायदा होणार असा सवालही त्यांनी केला आहे.
झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ धाम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की देशातील परिस्थिती चांगली नाही. महागाई आणि बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. लोक उपासमारीला बळी पडत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींनी पुन्हा लोकांना फसवण्याचा मार्ग अवलंबला आहे, पण त्यांचे सत्तेतून बाहेर पडणे निश्चित आहे.
निवडणुकीपूर्वी जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात कपात करण्यात आली पण त्यासाठी त्यांनी मोठा अविर्भाव आणला. वास्तविक भाववाढ करून त्यांनी जनतेला लुटले आणि त्यातूनच ही सवलत दिली गेली असे ते म्हणाले,. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला, अन्यही ठिकाणी त्यांचा असाच सफाया होईल असे ते म्हणाले.
ंइंडिया आघाडीच्या पुढील रणनितीबाबत विचारले असता ते म्हणाले की 28 विरोधी पक्षांच्या समन्वय समितीची पहिली बैठक 13 सप्टेंबर रोजी दिल्लीत होत आहे, ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी होईल, त्यात पुढील दिशादर्शन स्पष्ट होईल असे ते म्हणाले. विरोधी आघाडीचा नेताही योग्यवेळी निवडला जाईल असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.