कोल्हापूर – गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालकमंत्रीदेखील निवडले जातील. राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळेल, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरे म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो आहोत. पण आम्हीदेखील पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. पक्षवाढीसाठी आमचादेखील खारीचा वाटा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचेही तटकरेंनी यावेळी सांगितले.
2004ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण का संधी गमावली माहित नाही. ज्यांचे जास्त आमदार असतील तो मुख्यमंत्री होईल, आम्हाला मुख्यमंत्रिपदाची घाई नाही. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे सर्वांनाच वाटते. हे सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशील आहे. मला दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची कीव येते. कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू आहे. उद्धव ठाकरेसुद्धा सभा घेत आहेत. अजित पवार यांना मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्याकडून आमच्यावर टीका होत आहे, असेही तटकरे म्हणाले.
म्हणून बॅनरवर पवारांचा फोटो नाही
महाविकास आघाडीमध्ये सामील होताना शिवसेनेबरोबर गेलो. मग आता विचारसरणी बदलली असे होत नाही. आम्ही आमचा विचार बदलला नाही. आमच्या विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत. शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण त्यांनी आमच्यासोबत सामील होण्याबाबत आजही अपेक्षा आहे. साहेबांना त्रास होऊ नये म्हणून बॅनरवर फोटो लावलेले नाहीत. ईडीला घाबरून आम्ही गेलो हा आरोप चुकीचा आहे, असेही तटकरेंनी यावेळी म्हटले.