पुणे – पावसाळ्यात विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण वाढते. यंदा पाऊस, ढगाळ वातावरण आणि ऊन असा विचित्र हवामानामुळे संसर्गजन्य आजारासह डेंगू, मलेरियाच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लहान मुले लवकर आजारी पडत असल्याने पालकांनी विशेस खबरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
विषाणूजन्य संसर्गांमध्ये अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, सर्दी, फ्लू सारखे आजार, विषाणूजन्य पोटाचा संसर्ग, डोळ्यांच्या संसर्गाने ग्रासलेले दररोज जवळपास 15 ते 20 रुग्ण उपचाराकरिता येतात. तर पुणे महापालिका हद्दीत गेल्या महिन्याभरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. ताप, खोकला, सर्दी, जुलाब, उलट्या, अंगदुखी, डोकेदुखी,अन्नावरील वासना उडणे, अशा तक्रारी घेऊन अनेक बालरुग्ण उपचाराकरिता येत आहेत. यामध्ये दहा वर्षाखालील शाळकरी मुलांचा समावेश आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे बालरोगज्ज्ञ डॉ. वृषाली बिचकर यांनी सांगितले.
पावसाळ्यात जागोजागी पाण्याचे डबके साचलेले असते. त्यामध्ये घाण पाणी हे साचलेले राहते, ज्यामुळे कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळसारख्या आजारांची लागण होते. ताप येणे, डोकेदुखी, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधेदुखी, कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ, डेंग्यु या रोगाची लक्षणे आढळून आल्यास पालकांनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. एखाद्या मुलाला सर्दी, ताप, खोकला असल्यास तो बरा झाल्यानंतर त्याला शाळेत पाठवावेत. याशिवाय मुलांमध्ये डोळ्यांची साथ वाढत आहे, काळजी घ्यावी, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. इरफान पल्ला यांनी आवाहन केले.
काय काळजी घ्यावी…
- न चुकता फ्लूचे डोस देणे
- नियमित लसीकरण, हातांची स्वच्छता
- शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकणे, मास्कचा वापर
- रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात भाज्या, फळांचा समावेश करा
- आजारपणात मुलांना शाळेत पाठवणे टाळा
- मुलांचे हायड्रेशन आणि न्यूट्रिशनचा समतोल राखणे आवश्यक