अरुण पवार
पाटण – तालुक्यातील वनकुसवडे परिसरातील दुर्गम रामेल गावात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या बोटूलिझमसारख्या संसर्गजन्य रोगामुळे 15 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच या रोगाची साथ पाळीव जनावरांमध्ये वेगाने पसरत असून ही साथ आटोक्यात आणण्यासाठी, पाटणच्या पशुवैद्यकीय विभागाला अद्याप तरी अपयश आलेले नाही.
पाटण तालुक्यातील दुर्गम भागात गाई, म्हशी, मेंढ्या आदी पाळीव जनावरे पाळण्याचे प्रमाण मोठे आहे. याच पशुधनाच्या आधारावर लोकांना दूध विकून चार पैसे हातात मिळतात. मात्र, दर पावसाळ्यात तालुक्यात बोटूलिझमसारख्या विषजन्य रोगामुळे पशुधनावर संकट ओढवते. सर्वात धोकादायक म्हणजे या रोगावर कोणताही उपचार नाही. पाळीव जनावरांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्याने ती जनावरे पठारावर अगोदरच मेलेल्या जनावरांची हाडे चघळतात. तसेच कुजलेले गवत खातात.
त्यामुळे त्यांच्या शरीरात विषाणूचा प्रवेश होऊन ताप येणे व अंग लुळे पडल्याने ती मृत्युमुखी पडतात. अशा मृत जनावरांना मोठा खड्डा काढून पुरावे लागते. सडावाघापूर, वनकुसवडे, ढेबेवाडी मोरणा पठार येथे उंच विस्तीर्ण पठार आहे. याच पठारावर मोठ-मोठ्या पवनचक्क्यांचे जाळे असून या भागातील गावांमध्ये जनावरे पाळण्याचे प्रमाण मोठे आहे. एखादे जनावर मेल्यास येथील लोक त्याला जमिनित खोल खड्डा खोदून पुरून टाकण्याऐवजी पठारावर फेकून देतात. त्यामुळे त्या बोटूलिझमबाधित मृत जनावरांची इतरत्र विखुरलेली हाडे इतर पाळीव जनावरांनी चघळल्याने त्या जनावरालाही बोटूलिझमचा संसर्ग होतो.
“पशुवैद्यकीय’चा लंपीच्या लसीवर भर
तालुक्यात दरवर्षी बोटूलिझम हा जनावरांचा आजार येतो. हे पशुवैद्यकीय विभागाला माहीत असूनही पाटणचा पशुवैद्यकीय विभाग पावसाळ्यापूर्वी दुर्गम भागात जाऊन जनजागृती करत नाही. सध्या हा आजार पसरल्याने पशुवैद्यकीय विभागाने जनावरांना लंपी आजाराची लस देण्याची मोहीम उघडली आहे.
मोरणा भागातही बोटूलिझमचा संसर्ग
नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात तालुक्याच्या मोरणा परिसरातील पाचगणी गावात बोटूलिझममुळे सहा जनावरांचा मृत्यू झाला होता. तसेच काहिर गावातही या आजरामुळे काही जनावरे मृत्युमुखी पडली. त्यामुळे या रोगाला वेळेवरच आटोक्यात आणले नाही, तर पाटण तालुक्यातील संपूर्ण पशुधन धोक्यात येईल.