आळंदी – आळंदी नगरपरिषद मार्फत शहरातील पात्र दिव्यांगाचा चार लाखांचा विमा उतरविण्यात आला आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या केंद्र सरकार पुरस्कृत योजना लागू करून, या योजनांचा वार्षिक प्रीमियमची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यापुढेही दरवर्षी दिव्यांगांसाठी विमा योजनेचा प्रीमियम नगरपरिषदेकडून भरण्यात येणार असल्याची माहिती, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत 22 पात्र लाभार्थी तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा 41 पात्र लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर प्रीमियमची रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनांचा विमा कालावधी 1 जून ते 31 मे असणार आहे. दरवर्षी 31मेच्या आधी ही वार्षिक हप्त्याची रक्कम नगरपरिषद मार्फत पात्र लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. शहरातील पात्र वयोगटतील दिव्यांगांना 4 लाखांचे विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण घोडे, वैशाली पाटील यांनी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन फॉर्म भरून घेऊन बॅंकांशी समन्वय साधून परिश्रम घेतले.
“नेहमीच्या आर्थिक साहाय्याच्या स्वरुपातील मदतीबरोबरच शहरातील पात्र दिव्यांग बांधवांना विमा कवच देण्याचा नगरपरिषदेने प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबास अडचणीच्या काळात मोठा आर्थिक आधार उपलब्ध होईल.” -कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
विमा योजनेतील तरतूद –
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना- -लाभार्थी 18 ते 50 वर्ष वयोगटातील नागरिक. वार्षिक प्रीमियम – 436 + सेवाकर, कोणत्याही कारणामुळे विमा धारकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नामनिर्देशित वारसाला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना- लाभार्थी 18 ते 70 वर्ष वयोगटातील नागरिक, वार्षिक प्रीमियम रुपये 20 +सेवाकर, अपघातामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित वारसाला 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य. विमाधारकाला पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये तसेच अंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये आर्थिक साहाय्य.