नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर लोकसभा सभागृहातून निलंबित करण्याची जी कारवाई करण्यात आली आहे, त्यावरून कॉंग्रेस सदस्यांनी लोकसभेत आज जोरदार गदारोळ केला. या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
सभागृहाची बैठक सुरू होताच कॉंग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी चौधरी यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला.चौधरी यांनी नेहमीच सभापतींना सहकार्याची भूमिका घेतली आहे आणि ओम बिर्ला यांनीही त्याचा वारंवार उल्लेख केला आहे. असे असताना ही आततायी कारवाई कशाच्या आधारावर केली गेली असा सवाल गोगोई यांनी उपस्थित केला.
अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अधीर रंजन चौधरी यांनी वारंवार व्यत्यय आणल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी चौधरी यांच्या निलंबनाचा ठराव मांडला होता.इंडिया आघाडीच्या सर्वच सदस्यांनी नंतर लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला.
संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर सभापतींकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याच्यावरही विरोधकांनी बहिष्कार घातला. विरोधी पक्षाच्या सदस्यांना विविध समित्यांच्या कामकाजात भाग घेता येऊ नये म्हणून त्यांचे असे बेकायदेशी निलंबन करण्याचा प्रकार मोदी सरकारने सुरू केला आहे. तो यापुर्वी कधीच झाला नव्हता असा आरोपही त्यांनी केला.