पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दापोडी येथील मुस्लिम दफनभूमीची संरक्षक भिंतीला तडे गेल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने मुस्लिम बांधवांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी आहे. दापोडी येथील दफनभूमीची संरक्षक भिंत त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दापोडी येथे पवना नदीच्या काठावर मुस्लिम बांधवांची दफनभूमी आहे. या दफनभूमीच्या जवळून ड्रेनेजलाइन गेली आहे. ड्रेनेजलाइनची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या वतीने खोदाई करण्यात आली. या वेळी दफनभूमीच्या संरक्षक भिंतीला धक्का लागून चिरा पडल्या आहेत. ही भिंत मूळ कॉंक्रिटच्या कमानीपासून विभक्त झाली आहे. भिंत कधीही कोसळू शक्यते. त्यामुळे दफनभूमीत अंत्यविधीसाठी अथवा कोणी वाटसरू येथे आला आणि भिंत कोसळली तर अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे मुस्लिम नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार या भिंतीची दुरुस्ती करून देणयाची मागणी केली आहे. परंतु महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची भावना मुस्लिम नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मुस्लिम बांधवांना मृत्यू पावलेल्यांना दफन करण्यासाठी दापोडी येथील कब्रस्तानमध्ये यावे लागते. कब्रस्तानमध्ये कुत्री, अथवा मानवी हस्तक्षेप होऊ नये यासाठी संरक्षक भिंत व गेट बांधण्यात आले आहे. या गेटच्या बाजूला असलेल्या भिंतीला चेंबरचे काम करताना धक्का लागल्याने भिंतीला चिरा गेल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. या पावसात भिंत कोसळून अनर्थ होऊ नये यासाठी महापालिकेने येथील संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
गवताचे वाढले प्रमाण
दफनभूमीमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे डसांचे प्रमाण वाढले आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना डासांचा त्रास होत आहे. तसेच गवत व झाडेझुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दफनभूमीची साफसफाई करणे गरजेचे आहे.
मुस्लिम बांधवांना अंत्यविधी करण्यासाठी नदीच्या काठावर महापालिकेच्या वतीने दफनभूमी निर्माण केली आहे. परंतु या दफनभूमीची संरक्षक भिंतीला तढे गेल्याने कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही भिंत नव्याने बांधण्यासाठी वारंवार महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु प्रशासन याला दाद देताना दिसून येत नाही.
– रोहित काटे, माजी नगरसेवक.
दफनभूमीच्या संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. या भिंतीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल. सध्या या कामाचे टेंडर नव्हते. त्यामुळे काम थांबले होते. आता टेंडर पास झाले आहे. त्यामुळे लवकर काम करण्यात येईल.
– सुनील दांगट, उप अभियंता.
दफनभूमीच्या भिंतीला तडे गेले आहेत. ती धोकादायक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ही भिंत काढून नवीन भिंत तयार करावी. आम्ही वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दखल घेत नाही.
– समीर शेख, नागरिक.
महापालिकेच्या वतीने चेंबरची दुरुस्ती करण्यासाठी बाजूला खड्डा खोदताना दफनभूमीच्या संरक्षक भिंतीला धक्का लागला. त्यामुळे भिंतीला तडे गेले आहेत. ही भिंत कोसळण्याची भीती आहे. महापालिका प्रशासनाने येथील संरक्षक भिंत लवकरात लवकर नवीन बांधून द्यावी.
– फाईम शेख, अध्यक्ष.