बार्बाडोस :- नवा कर्णधार, नवोदित खेळाडू तसेच नवे वातावरण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम यजमान वेस्ट इंडिज संघाला अपेक्षित असला तरीही प्रत्यक्ष सामन्यात काय होणार हे त्यांचा खेळ कसा होतो यावरच अवलंबून राहणार आहे.
वेळ – संध्याकाळी 7 पासून
(भारतीय प्रमाणवेळेनूसार)
ठिकाण – बार्बाडोस
थेट प्रक्षेपण – डीडी स्पोर्टस
आज त्यांचा भारतीय संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना होणार असून कसोटीतील फॉर्म कायम राखत या सामन्याद्वारे तीन सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.
भारताच्या फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना क्षमतेपेक्षाही जास्त मेहनत करावी लागणार आहे. अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, रोमारिओ शेफर्ड, केविन सिंक्लेअर यांच्यावर भारताची भक्कम फलंदाजी रोखण्याचे आव्हान राहील.
तर दुसरीकडे मर्यादित षटकांच्या सामन्यांचा कर्णधार शाई होप याच्यासह शेमरन हेटमायर, केल मायर्स, एलिस अथांजे यांच्यासह नवोदित डॉमनिक ड्रेक, केसी कार्टी यांच्या कामगिरीवरही नजर राहणार आहे. मात्र, त्यांना निकोलस पूरन व जेसन होल्डर यांच्या अनुपस्थितीचा फटका निश्चितच बसू शकतो. केवळ त्यांना वगळून नवोदितांना संधी दिली म्हणजे संघबांधणी होत नसते हे कदाचित त्यांना या पहिल्या सामन्यानंतर लक्षात येणार आहे.
दुसरीकडे भारतीय संघ कसोटी मालिका जिंकल्यामुळे भरात असला तरीही या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघातही काही बदल केले गेले आहेत. मात्र, शुभमन गिलच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
गिलने सातत्याने कामगिरी सिद्ध केली असल्याने तोच कर्णधार रोहित शर्मासह डावाची सुरुवात करेल. त्यातच सूर्यकुमार यादव, विराट कोहली, इशान किशन अशी भक्कम फलंदाजी भारताकडे आहे. त्यातच अष्टपैलु हार्दिक पंड्या संघात परतल्याने भारतीय फलंदाजी खोलवर बनली आहे.
संघात रवींद्र जडेजाही असल्याने भारताला गोलंदाजीचीही चिंता भोडसावणार नाही. एकूणच या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघाचेच पारडे जड राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
पंड्याच्या कामगिरीवर लक्ष..
भारतीय संघाचा अष्टपैलु क्रिकेटपटू हार्दीक पंड्या या मालिकेत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे. आयपीएल स्पर्धा पार पडल्यावर मोठ्या कालावधीनंतर तो आंतरराष्ट्रीय सामन्यात परतला असल्याने त्याचकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याने येथे दाखल झाल्यावर नेटमध्ये कसून सराव केला असला तरीही तो अद्याप गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे दिसत नसल्याने कर्णधार रोहितसमोर काही प्रमाणात चिंता निर्माण होणार आहे.