मुंबई : राज्यात रोज नवीनवीन राजकीय घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या फुटीनंतर अजित पवार गटाचे मंत्री काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा अजित पवार गटाचे सर्वच आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीमागचे कारण स्पष्ट केले.
आज सभागृहासाजे कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. दरम्यान, शरद पवार हे आपल्या सिल्वर ओक निवासस्थानावरुन यशवंतराव चव्हाण सेंटरला पोहचले.यानंतर आमदार आणि शरद पवारांमध्ये चर्चा देखील झाली. यानंतर बाहेर येताच पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटीमागचे कारण स्पष्ट केले.
शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी पटेल म्हणाले, अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवारांची आज पुन्हा भेट घेतली. पक्ष एकसंघ रहावा यासाठी शरद पवार यांनी विचार करावा, अशी विनंती आम्ही केली असल्याचे पटेल यांनी यावेळी सांगितले. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. परंतु त्यांच्या मनात काय आहे ही मी सांगू शकणार नाही असंही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
काय म्हणाले पटेल नेमकं यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री, आमदार, अजित पवार, मी आणि सुनील तटकरे वाय. बी. सेंटर येथे आलो होतो.
कालही आम्ही शरद पवार यांची भेट घेतली होती. पंरतु काल केवळ मंत्रीच उपस्थित होते, बरेच आमदार नव्हते.
अधिवेशनासाठी बरेच आमदार आज मुंबईत उपस्थित होते.
हे सगळे जण आणि आम्ही आज शरद पवार यांना भेटायला इथे आलो.
सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला.
पक्ष एकसंघ राहावा यासाठी साहेबांनी विचार करावा अशी विनंती करून आम्ही इथून जातोय.