मुंबई – अजित दादा अर्थमंत्रिपद मिळवण्यासाठी दिल्ली दरबारी गेले होते. त्यावेळी त्यांना हे खाते देऊ नये म्हणून भाजप श्रेष्ठींना गळ घालण्यासाठी शिंदे गटाचेही लोक दिल्लीत गेले होते पण त्यांना तेथे सज्जड इशारा मिळाल्याने त्यांना माघारी परतावे लागले, अशी आपली माहिती आहे असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, भाजप श्रेष्ठींनी शिंदे गटाला राहायचे तर राहा नाहींतर बाहेर पडा असा इशारा दिल्याचीही आपली माहिती आहे असेही राऊत यांनी म्हटले आहे. त्याखेरीज भाजप श्रेष्ठींकडून शिंदे गटाला असा पर्याय देण्यात आला की तुम्ही अर्थ खाते सांभाळा पण मग मुख्यमंत्रीपद अजित दादांकडे द्या. हा पर्याय म्हणजे एक सज्जड इशारा असल्याने हा गट रिकाम्या हाताने परतल्याचेही राऊत यांनी सूचित केले. अजित दादांना अर्थखाते मिळाल्याने आता या गटाचे लोक टाळ्या वाजवत असताना दिसत असले तरी आपल्याला मिळालेली माहिती अशी आहे, असे त्यांनी नमूद केले.
महविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अर्थमंत्रिपद दादांकडे होते. त्यांनी आम्हाला निधी मिळू दिला नाही अशी तक्रार त्यावेळी शिंदे समर्थक आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. आणि त्यामुळेच आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो असे कारण त्यांनी दिले होंते. पण आता अजित दादांनाच अर्थमंत्री पद दिले गेल्याने आता शिंदे गटाच्या आमदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे, अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.