मुंबई – मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते ‘रवींद्र महाजनी’ यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. मिळलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यात आंबी येथील एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत ते आढळले. फ्लॅट मधून दुर्गंधी येत असल्याने लोकांनी पोलिसांना कळवले.
फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. रवींद्र महाजनी हे भाड्याने फ्लॅट घेऊन एकटेच तेथे राहात होते. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘मराठी चित्रपट सृष्टीतील राजबिंडा व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या रविंद्र महाजनी यांचे जाणे सर्वांनाच चटका लावणारे आहे. ‘देवता’ या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘खेळ कुणाला दैवाचा कळला?’ या ओळींची आज प्रत्यक्षात अनुभूती होत आहे..” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. मुंबईचा फौजदार चित्रपटाद्वारे ते प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलेच नाही. देवता चित्रपटात ‘दैवलेख ना कधी कुणा टळला, खेळ कुणाला दैवाचा कळला?’
याचा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात येतो, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील रुबाबदार आणि अष्टपैलू अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. अशा भावना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या व्यक्त केल्या आहेत.