मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी पुन्हा एकदा महाभूकंप झाला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही फुट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली.
शरद पवार म्हणाले की, “संकटाचा काळ देशावर आला आहे. चुकीच्या प्रवृत्ती राज्य करत आहेत. त्यामुळेच चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र. शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. यामागची भूमिका जातीय विचारधारा पुढे आणायची आणि त्यांच्या मार्फत देशाचा कारभार करायचा अशी आहे. महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका याच प्रवृत्तीने घेतली. दुर्दैवाने त्यांना यात यश आलं. लोकशाहीचा अधिकार हा जतन करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही याची मला खात्री आहे आणि महाराष्ट्रात उलथापालथ करणारी शक्ती आहे त्यांना जागा दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही.
“चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र. या राज्यात एकदंर लोकशाहीच्या पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. जातीय तेढ निर्माण केली जात आहे. या प्रवृत्ती वाढल्या आहेत. मात्र सहा महिने-वर्षभराच्या कालावधीतच निवडणुका होत आहेत. त्या कालावधीत आपण यांना यांची जागा दाखवून देऊ. उलथापालथ करणाऱ्या शक्ती बाजूला करु आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर घेऊन जाऊ,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार आपण एकत्रित केले होते. कर्तृत्वान सहकारी महाराष्ट्राची सेवा करत होते. आज तेच सरकार उलथवून टाकण्याचं काम काही लोकांनी केलं. हे देशाच्या अनेक राज्यांमध्ये केले. मध्य प्रदेशसारखं राज्य. कमलनाथ मुख्यमंत्री, गांधी-नेहरूंचा विचार. व्यवस्थित चाललेलं राज्य उलथवलं गेलं. त्या ठिकाणी जातीय, संघीय वृत्तीला प्रोत्साहन देणारं सरकार आणलं,” असे शरद पवार म्हणाले.