कोपरगाव – नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू असून, या कामामुळे कोपरगावनजीक पुणतांबा चौफुली येथे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत. माजी आ. स्नेहलता कोल्हे आज (सोमवार) दुपारी कोपरगावहून शिर्डीकडे जात असताना त्यांना पुणतांबा चौफुली येथे ट्रॅफिक जाम झाल्याचे पहावयास मिळाले.
नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावे आणि या महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजना करावी, अशा सूचना कोल्हे यांनी या वेळी संबंधितांना दिल्या.
पुणतांबा चौफुली येथे नगर-मनमाड महामार्ग व मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब बनली आहे. आज (सोमवार) दुपारी वाहतूक कोंडीमुळे या महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ही बाब या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या माजी कोल्हे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांशी महामार्गाच्या कामासंदर्भात चर्चा केली. नगर-मनमाड महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. नगर-मनमाड महामार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होऊन नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
या महामार्गावर अनेक धार्मिक स्थळे असून, या ठिकाणी रोज लाखो भाविक येतात. सध्या लग्नसराई सुरू असून, आषाढी यात्रेसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी व भाविकांची वर्दळ या महामार्गावर वाढली आहे. येत्या 3 जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव असून, त्यानिमित्ताने शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर, कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिर,
सद्गुुरू शुक्राचार्य महाराज मंदिर, कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ आदी ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे. या महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या, प्रवाशांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन दुरुस्तीचे काम लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे.
वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी खबरदारी घ्यावी, तसेच वळण रस्ता रुंद करून वाहतूक सुरळीत करावी, अशा सूचना कोल्हे यांनी संबंधित प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक मेनन, ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.