संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज यांसह राज्य- परराज्यांतील संतांचे पालखी सोहळे आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या मार्गावर आहेत. यात महत्त्वाचा घटक म्हणजे दिंडी. एका दिंडीत 15-20 वारकऱ्यांपासून ते हजार-दोन हजार वारकरी आणि अशा शेकडो दिंड्याचा मिळून पालखी सोहळा. असा लाखोंचा जनसमुदाय विठुरायाच्या दर्शनासाठी निघाला आहे.
दिंडीची व्याख्या अशी सांगितली जाते, की “एका विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्यदेवतेच्या तीर्थक्षेत्री, दरवर्षी एका विशिष्ट तिथीस होणाऱ्या उत्सवास हजर राहण्यरसाठी अभंग गात, नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्तीसमूहास दिंडी असे म्हणतात.’
वारकरी संप्रदायातील दिंडीची परंपरा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आदी संत मंडळी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांसह निघत असत. त्यांच्या हाती ध्वज, पताका असायचे. या मिरवणुकीस दिंडी असे म्हणण्यात येत असे. कालानुरूप याचे स्वरूप बदलले असून आता ही दिंडी वारकऱ्यांची निघते. ते आपसात वाटेत येणाऱ्या खर्चासाठी एक ठराविक रक्कम गोळा करतात व आपल्या गावातून पंढरीस पायी जाण्यास निघतात. तसेच काही दिंडी या संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरीला जातात.
या वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो. त्यातील बहुतेकांच्या खांद्यावर पताका/ध्वज असतो. कपाळास टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारकरी दिंडीत सामील होतो. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पंढरपुरात वर्षात होणाऱ्या चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी या चार वाऱ्यांपैकी आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या-सत्पुरुषांच्या पालख्या पंढरीस येतात. या पालख्यांमध्ये अनेक दिंडया सहभागी असतात. वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन असल्याचे म्हंटले जाते.
दिंडीची रचना – पंढरीच्या विठ्ठलाची वारी ही एकट्याने नव्हे, तर समूहाने केली जात असल्याचे दिसते. पंढरीची वारी ही सामूहिक भक्ती आहे. सर्व विठ्ठलभक्तांनी एकत्र जमून, अभंग गात, टाळमृदुंगाच्या गजरात वाजत गाजत आनंदाने पंढरीची वारी करण्याची पध्दत आहे. अशा प्रकारे टाळ, मृदुंगासह, हाती भगवी पताका घेऊन अभंग गात, नाचत पंढरीस जात असतात.
दिंडीची रचना पहिली असता प्रारंभी भगवी पताका धारण करणारे काही वारकरी, त्यामागे टाळ वाजविणारे टाळकरी वारकरी, मध्ये मृदुंगवादक, त्यामागे गळयात वीणा धारण करणारा वीणेकरी, त्यामागे अन्य महिला वारकरी, त्यांमध्ये काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी होतात. अशी एका दिंडीची रचना असते. भार पताकांचे करी । भीमातीरी आनंद।। असे वारकऱ्यांच्या दिंडीचे वर्णन संत ज्ञानदेव-तुकोबांनी केलेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज तेराव्या शतकात अशा प्रकारची वारकरी दिंडी घेऊन पायी चालत पंढरीला गेल्याचे अनेक अभंग आहेत. संत नामदेव-संत जनाबाई आणि संत तुकाराम महाराज यांनीही आपल्या अभंग साहित्यात दिंडीचे वर्णन करणारे अभंग लिहिलेले आहेत.
श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीची शिस्त
श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात शेकडो दिंड्या सहभागी आहेत. तर मानाच्या 47 दिंड्या आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान रथाच्या पुढे 27 तर रथामागे मानाच्या 20 दिंड्या आणि त्यामागे इतर शेकडो दिंड्या आहेत. सहभागी झालेले लाखो वारकरी.. एवढा मोठा जन्समुदाय असला तरी सोहळ्यात कुठेही गडबड गोंधळ नसतो. सर्व कार्यक्रम शिस्तीत पार पडतात. सकाळी पालखी निघाली की सर्व दिंड्या ठरल्याप्रमाणे पालखी रथापुढे आणि मागे चालतात. विसावा झाला, की शिस्तीने आपल्या ठरलेल्या ठिकाणी जातात. तसेच दैनंदिन कार्यक्रम समाज आरती, कीर्तन आदी वेळेस नियमानुसार त्यांचा क्रम ठरलेला. दिंडीत चालण्याचा नियम कोणीही मोडत नाहीत. ही वारी आजही अखंड सुरू आहे.