ब्रिटीश साम्राज्याने भारतीय साम्राज्यातून कोहिनूर हिरा घेतल्यापासून कोहिनूर हिरा भारत आणि ब्रिटन यांच्यातील वादाचा मुद्दा आहे. राणी एलिझाबेथने तिच्या मृत्यूपूर्वी परिधान केलेल्या असाधारण मुकुटात हा हिरा शेवटचा दिसला होता.
* सध्याच्या राणीला कोहिनूर हिरा आवडत नाही?
परंपरेनुसार, राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर, आता राणी कन्सॉर्ट कॅमिला यांना हा शाही मुकुट परिधान करावा लागणार आहे, परंतु मनोरंजक गोष्ट म्हणजे राणी कन्सॉर्ट कॅमिलाने हा मुकुट घालण्यास नकार दिला आहे. मौल्यवान कोहिनूर हिऱ्याशी संबंधित वादग्रस्त इतिहास पाहता त्यांनी हा मुकुट घालण्यास नकार दिला आहे. किंग चार्ल्सची पत्नी राणी कॅमिला यांनी म्हटले आहे की त्या कोहिनूर हिऱ्यापासून अंतर ठेवतील आणि त्याऐवजी राणी मेरीचा जुना मुकुट परिधान करतील.
* कोहिनूर हिऱ्याची किंमत काय ?
ब्रिटनच्या प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द डेली टेलिग्राफ’च्या सहयोगी संपादकाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, कदाचित राजघराण्याला कोहिनूरशी संबंधित वादाची माहिती असेल आणि म्हणूनच त्यांना या हिऱ्याचे उगमस्थान कळू नये असे वाटते. याबाबत आणखी काही वाद असावा. पंजाब ताब्यात घेतल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने व्हिक्टोरिया राणीच्या मुकुटात कोहिनूर हिरा बसवला होता. राणी व्हिक्टोरियाच्या मुकुटात बसवण्यापूर्वी जुन्या मेट्रिक पद्धतीनुसार या हिऱ्याचे वजन १८६ कॅरेट (१९१ मेट्रिक कॅरेट किंवा ३८.२ ग्रॅम) होते. एवढ्या मोठ्या आकारमानामुळे आणि वजनामुळे हा जगातील सर्वात महागडा हिरा आहे आणि सध्या त्याची किंमत २० अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे १.६४ लाख कोटी रुपये आहे.
* कोहिनूरचा वादग्रस्त इतिहास काय आहे?
कोहिनूरचा इतिहास हा खून, लढाया, सत्ता व शोकांतिकांचा इतिहास आहे. काही सूत्रांनुसार कोहिनूर सुरुवातीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी तो भारतातील गोवळकोंडा (की पन्ना?)येथील खाणीत सापडला असावा. एका कथेप्रमाणे, सूर्याने सत्राजित राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी. सत्राजिताचा भाऊ प्रसेन हा हिरा बरोबर घेऊन शिकारीला गेला होता. तिथे एका सिंहाने त्याला मारून तो मणी नेला. पुढे जाम्बुवंताने सिंहाला मारून मणी हस्तगत केला. मात्र मणी चोरल्याचा आळ आला श्रीकृष्णावर. श्रीकृष्णाने मण्याचा शोध घेऊन पुढे जाम्बुवंताशी युद्ध केले. अखेरीस जाम्बुवंताने श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला मणी व आपली कन्या जाम्बुवंती अर्पण केली. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजितास परत केला. पुढे सत्राजिताची मुलगी सत्यभामा हिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह होऊन श्रीकृष्णाला स्यमंतक मणी वरदक्षिणेत मिळाला. त्यानंतर श्रीकृष्णाने तो सूर्याला परत केला असे म्हणतात.
त्यानंतर १६ व्या शतकामधे आलेल्या बाबर बादशहाचा इतिहास, बाबरनामा (इ. सन १५२६ ते १५३०), यात या हिऱ्याचा उल्लेख येतो. मे १५२६ मधे बाबर जेव्हा आग्रा येथे आला, तेव्हा तेथील राजा विक्रमादित्य याने तो दिला असावा. पुढे हिरा बाबराचा मुलगा हुमायून याच्याकडे गेला. पुढील २०० वर्षे तो बाबरचा हिरा म्हणून ओळखला जात असे. काही सूत्रांनुसार ‘ द ग्रेट मुगल’ आणि कोहिनूर हे हिरे एकच होत. पुढे हा हिरा मुगलांचे वारसदार शाहजहान व औरंगजेब यांच्याकडे आला.
पर्शियाचा (सध्याचा इराण) नादिरशहा याने मुगलांची दिल्ली व आग्रा ही शहरे लुटली, तेव्हा तो त्यांचे मयूर सिंहासन व कोहिनूर घेऊन मायदेशी परत गेला. पहिल्यांदा हा हिरा पाहिल्यावर नादिरशहा आश्चर्याने उद्गारला “कोह-इ-नूर” म्हणजे “प्रकाशाचा पर्वत”. तेव्हापासूनच कोहिनूर हे नाव प्रचलित आहे. इ.सन १७४७ मधे नादिरशहाचा खून झाला व कोहिनूर आला अफ़गाणिस्तानच्या अहमदशहा अब्दालीकडे. इ.सन १८०९ मधे अफ़गाणिस्तानच्या शाह शुजाला पदच्युत करण्यात आले तेव्हा शुजा कोहिनूर घेऊन पळाला. शुजाने पंजाबचा महाराजा रणजितसिंग याची मदत घेऊन इ.सन १८३९ मधे अफ़गाणिस्तानची गादी परत मिळवली आणि कोहिनूर रणजितसिंगला कृतज्ञतापूर्वक भेट दिला.
कोहिनूरचा पुढील इतिहास रक्तलांव्छितच आहे. पुढे कोहिनूर पंजाबच्या महाराजा रणजितसिंगचा अल्पवयीन मुलगा दलिपसिंग याच्याकडे गेला. इंग्रजांनी रणजितसिंगाचा लाहोर येथे पराभव करून कोहिनूर जिंकला व तो इतर रत्नांबरोबर लंडन येथे बळजबरीने नेऊन राणी व्हिक्टोरियाला नजर केला. हिऱ्याबरोबर इंग्रजांनी दलिपसिंगलाही इंग्लंडला नेले.
इ.सन १८५३ मधे व्हिक्टोरियाचा पती, अल्बर्ट याने त्याला पुन्हा पैलू पाडायची टूम काढली. अल्बर्टच्या मूर्खपणामुळे त्याचे काही तुकडे वेगळे होऊन मूळ हिऱ्याचे वजन १८० कॅरेटवरून १०५ कॅरेट एवढे कमी झाले. सध्या हा हिरा लंडन येथील राणीच्या खजिन्यात (लंडन टॉवर येथे) पहावयास मिळतो