होय होय वारकरी ।
पाहे पाहे रे पंढरी ।।
काय करावीं साधनें ।
फळ अवघेचि येणें ।।
अभिमान नुरे ।
कोड अवघेचि पुरे ।।
तुका म्हणे डोळां ।
विठो बैसला सांवळा ।।
वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा. बाकीचे साधने काय करायची आहेत? सर्व काही फळ यानेच मिळते. असे केल्याने अभिमान नष्ट होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात, “डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो.’
पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले फार मोठे भाग्य आहे. देश-परदेशांतील अभ्यासकांचेही लक्ष वारीने वेधून घेतले आहे. महत्वाचे म्हणजे आज ज्या मूल्यांची समाजाला आवश्यकता आहे, ते म्हणजे समता आणि एकता यांना ती पोषक व पूरक ठरली आहे. महाराष्ट्रातील सर्वच संतांनी वारीचे महत्त्व सांगितलेले आहे. वारकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जाणवले, की बहुतांश वारकरी हे गेल्या 5,10,15,20…40 तर काहीजण त्याहूनही अधिक वेळा वारीत सहभागी झालेले आहेत.
या वारकऱ्यांना वारीबाबत सर्व माहिती असते. कोणता मुक्काम कठीण, कोणता सोपा.. वारीत काय साहित्य घ्यावे लागते, झोपण्याची, जेवणाची व्यवस्था कशी असते याबाबत सर्व माहिती असते. मात्र पहिल्यांदाच वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. 18-20 दिवसांच्या प्रवासात झोपायची व्यवस्था कशी असते? जेवणाची व्यवस्था कशी असते? आदी प्रश्न असतात.
वारी सोहळ्यात कसे सहभागी व्हावे?
संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात शेकडो दिंड्या असतात. एका दिंडीत 50, 100, 200, 500, 1000 त्याहून अधिक अशी वारकऱ्यांची संख्या असते. पालखीच्या पुढे आणि मागे दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीप्रमुख त्यांच्या दिंडीतील वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करत असतात. मात्र, त्या दिंडीत सहभागी होण्यासाठी “भिशी’ भरावी लागते. भिशी म्हणजे “दिंडी प्रवेश शुल्क’ हे शुल्क भरल्यानंतर दिंडी प्रमुख त्या वारकऱ्याला आपल्या दिंडीत सहभागी करून घेतात.
तसेच त्यांची झोपणे, जेवणे आदी व्यवस्था केली जाते. भिशीची रक्कम ही प्रत्येक दिंडीनुसार वेगवेगळी असते. दिंडीप्रमुख ती रक्कम ठरवत असतात. साधारणपणे ही रक्कम दीड ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान असते. दिंडीप्रमुख ही रक्कम वारकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी आकारत असतात. वारीतील मुक्कामांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था ही शाळा, धर्मशाळा, राहुट्यांमध्ये होत असते.
राहणे, भोजन आणि वाहन सुविधा
एका वारकऱ्याला दोन हजार रुपये भिशी असेल, तर दर दिवसाला 100 रुपये येतात. म्हणजेच केवळ 100 रुपयांत वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था होत असते. तसेच वारी सोहळ्यात अनेक वृद्ध वारकरी असतात अचानक काही आपत्कालीन घटना घडल्यास किंवा एखादा वारकरी अनावधानाने जखमी झाल्यास त्याला दिंडीचे साहित्य वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पोमध्ये बसवून वारी घडवली जाते. दिंडी प्रमुख वारकऱ्यांची सर्व प्रकारची काळजी घेत असतात.
“श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात आमची दिंडी माउलींच्या पालखी रथाच्या मागे 24व्या क्रमांकावर चालते. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी 1,500 रुपये भिशी ठरवलेली आहे. भिशी भरून दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची भोजनाची, मुक्कामाची जबाबदारी असते. भोजनासाठी काही दानशूर व्यक्ती पंगत देऊन सेवा करतात. तर काही वेळेला ज्या ठिकाणी कोणी पंगतदार नसतो, त्यावेळी आम्ही स्वतः भोजनाची व्यवस्था करतो. वारकऱ्यांकडून भिशी घेणे यात पैसे कमविण्याचा कोणताही स्वार्थ नसून ती रक्कम वारी काळात लागणाऱ्या आवश्यक बाबींसाठी खर्च केली जाते”, असे ह. भ. प. गिरीधर ज्ञानोबा सावंत (दिंडी प्रमुख : गुणाजीबुवा दिंडी क्र. 24) म्हणाले.