मुंबई – शिवसेना भवन येथे ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना संबोधित करताना सत्तासंघर्षाच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन या निकालातील महत्त्वाचे मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून संभ्रम दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे तयार राहा, गाफील राहू नका, असे आदेशही ठाकरेंनी या बैठकीत दिले आहेत.
18 जून रोजी मुंबईतील वरळी एनएससीआय डोम येथे भव्य पदाधिकारी मेळावा ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आला आहे. 19 जून रोजी षण्मुखानंद सभागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे निकालावरून संभ्रम निर्माण करत असल्याचे ठाकरे गटाच्या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे या निर्णयातील आपल्या बाजूने असलेले सकारात्मक मुद्दे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाची जबाबदारी या जिल्हाप्रमुखांकडे असेल. जिल्हा प्रमुखांच्या शंकांचे निरसन आणि प्रश्नांची उत्तर सुद्धा या बैठकीत देण्यात आली.
कर्नाटकात कॉंग्रेसला दणदणीत विजय मिळाल्यानंतर, इकडे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला उभारीची आशा निर्माण झाली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसायला सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून, रविवारी महाविकास आघाडीची सिल्वर ओक निवासस्थानी बैठक पार पडली आहे.