पुणे – असह्य वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या पुणेकरांबद्दल अधिकाऱ्यांना काहीशी कणव निर्माण झाली आहे. आता नगर रस्त्यावरील ही समस्या सोडवण्यासाठी अधिकारी मंडळींनी सर्वेक्षण केले आहे. आता ते उपाययोजना करण्याच्या हालचाली करत आहेत.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रित सर्वेक्षण केले. त्यानुसार अनेक ठिकाणी सुधारणा करण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणात रस्त्यावरील अनेक समस्या समोर आल्या आहेत. त्यांची तातडीच्या आणि दीर्घकालीन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. तातडीच्या उपाययोजना लगेच सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे आरटीओकडून पाठपुरावा केला जाणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए), पुणे महापालिका, वाहतूक पोलीस यांच्यासोबत समन्वय साधून या उपाययोजना केल्या जातील.
क्षमतेच्या दीडपट वाहनसंख्या
या मार्गावर अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडीसोबतच अपघातांचे प्रमाण वाढत आहे. लोणीकंद हद्दीत प्राणांतिक अपघातांची संख्या जास्त आहे. नगर रस्त्याची क्षमता 50 हजार पॅसेंजर कार युनिट (पीसीयू) आहे. प्रत्यक्षात ही क्षमता 75 हजार पीसीयूपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच या रस्त्यावरून क्षमतेच्या दीडपट वाहने जात आहेत. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात वाढले आहेत.
संभाव्य सुधारणांची यादी
नगर रस्त्यावर सेवा रस्ताच नसल्याने गावांच्या हद्दीत महामार्गालगत लोखंडी रेलिंग उभारणे.
वाघोलीच्या पुढे चौकांमध्ये सिग्नल बसवणे.
खडी रस्त्यांवर सांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.
निश्चित ठिकाणीच पीएमपी बस थांबवाव्यात.
रॉंग साइड येणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
रांजणगाव एमआयडीसीबाहेर रस्त्याबाजूला थांबा उभारणे.